अतिथी कट्टा

दिनांक : २५-०८-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌सायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…

‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या ३१ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. प्रसिद्ध लेखक गिरीश जोशी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्तानं या चित्रपटाबद्दलचं त्यांचं हे मनोगत.

——

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि मी… अशी आमची टीम गेली अनेक वर्षं काहीतरी चांगलं करायचं ठरवत होतो. वास्तविक ‘काकस्पर्श’नंतर लगेचच आम्हाला नवीन चित्रपट करायचा होता. परंतु, तेव्हा ते शक्य झालं नव्हतं. तीच टीम काही वर्षांनी पुन्हा एकत्र आली आहे, याचा आनंद आहे. फक्त आमच्या भूमिका बदलल्या आहेत. या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला या कामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई-वडिलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

या संकल्पनेचा जन्म झाला तो माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या ५०व्या वर्षी घडलेल्या प्रसंगातून. हे नातेवाईक काही काळासाठी परदेशात असतात. परत आल्यावर त्यांच्या लक्षात येते की, त्यांचे काही लाख रुपये हे त्यांच्या क्रेडीट कार्डावरून ऑनलाइन काढले गेले आहे. अत्यंत हतबल झालेल्या या नातेवाईकांनी मग मला मदतीसाठी दूरध्वनी केला. मी मग त्यांना तक्रार नोंदविण्यासाठी सायबर सेल विभागात घेऊन गेलो. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणामध्ये मला माझ्या काकांच्या बाबतीत घडलेल्या त्या घोटाळ्याबाबत आणखी माहिती मिळत गेली. पण त्याचवेळी संपूर्ण जगात या अशा घोटाळ्यांचे प्रमाण किती मोठे आहे, हे ध्यानात आले. जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडीट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर

गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले.जरी हे माझ्या नातेवाईकच्या बाबतीत घडत असले तरी मी याबाबत मोठ्या प्रमाणावर लिहिले पाहिजे असे मनोमन ठरवून घेतले होते. जसजशा व्यक्तिरेखा आकार घेत गेल्या तसतसे ही सायबर क्राइमची समस्या किती गहन आहे, हे अधिकाधिक उलगडत गेले. ‘सर्वसाधारण संवादाचा अभाव आणि माणसामाणसांमधील तुटलेला संपर्क’ हे मध्यवर्ती सूत्र आकाराला आले. हाच धागा पुढे विकसित होत गेला आणि या प्रवासातील सर्जनशील भाग अधिकाधिक संमिश्र होत गेला. जसजसे मी लिहित गेलो तसतसा माझ्यातील दिग्दर्शक अधिकाधिक आकार घेऊ लागला. त्यातून मग गती येत गेली आणि चित्रपटाला लय मिळत गेली. जेव्हा मी चित्रपटाचा अंतिम ड्राफ्ट तयार केला, तेव्हा मी ठरवले की या चित्रपटाचे दिग्दर्शनही मीच करणार. ‘टेक केअर गुड नाईट’ मग माझ्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी मला खूप चांगली टीम मिळाली. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे असे चांगले कलाकार मला मिळाले आहेत. सर्वांनी अतिशय चांगले काम केले आहे. पाहूया आता प्रेक्षक या चित्रपटास कसा प्रतिसाद देतात ते.

— गिरीश जोशी

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया