ताज्या घडामोडी

अतिथी कट्टा

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३ सप्टेंबर २०२३ रोजी ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख

कलायात्रीच्या कलायात्रेतील प्रवासी

जीवन एक रंगभूमी............ पडदा उघडतो, सुख-दु:खाचा, ऊन-सावल्यांचा खेळ......... अभिनयाचा मेळ, आयुष्यभर... अथक.......

झटपट रिव्हियू

बापल्योक ================================================== दिग्दर्शक : मकरंद माने ================================================== कथा : विठ्ठल काळे ================================================== पटकथा, संवाद : मकरंद माने, विठ्ठल काळे ================================================== कलाकार : शशांक शेंडे, विठ्ठल काळे, नीता शेंडे, पायल जाधव ================================================== छायांकन : योगेश कोळी ================================================== संकलन : आशय गाताडे ================================================== दर्जा : तीन स्टार ================================================== कविता, साहित्य किंवा अगदी सिनेमांमध्येसुद्धा आई आणि मुलाच्या नात्यावर बरंच काही लिहिलं गेलंय; पण बाप-मुलाच्या नात्यावर तितकंसं बोललं गेलं नाहीय. आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही; हा जणू विरोधाभास म्हणावा लागेल. हाच धागा पकडून लेखक-दिग्दर्शक मकरंद माने यानं 'बापल्योक'मधून पितापुत्राच्या नात्याचा कोलाज रेखाटला आहे. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचं ओझं घेऊन धावणाऱ्या बापानं अजून जोरात पळायला हवं, असं प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असतं. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. 'प्रवास' झाल्याशिवाय जगणं समजत नाही आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. वडिलांशी 'आरेला कारे' करणारी मनोवृत्ती तयार होते; ती त्याच्यात होणाऱ्या कुमारवयीन बदलामुळे. हा प्रवास कथाकार आणि अभिनेता विठ्ठल काळे यानं लिहिला आणि पडद्यावर उत्तमरित्या दाखवला आहे. बाप आणि मुलाच्या नात्यात एक अदृश्य ताण कायमच असतो आणि त्या ताणाचा पीळ इतका जबर असतो की, नात्यातला ओलावा संपून जातो. हा ओलावा पुन्हा त्या बाप-लेकाच्या नात्यात आणण्याचा प्रवास म्हणजे 'बापल्योक' सिनेमा आहे. सिनेमाचा लेखक स्वतः शीर्षक भूमिकेत आहे. त्यानं सागर ही मुलाची व्यक्तिरेखा समजून-उमजून निभावली आहे. शशांक शेंडे तात्यांच्या अर्थात बापाच्या भूमिकेत हुकमी एक्क्याप्रमाणे पडद्यावर वावरतात. ‘बापल्योक’ या सिनेमाची प्रस्तुती नागराज मंजुळेची असल्यानं प्रेक्षकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा एका विशिष्ट टप्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’मधून साधला गेलाय. परंतु, हा प्रवास अत्यंत संथ आहे. पूर्वार्धातील निम्म्याहून अधिक सिनेमा वातावरणनिर्मिती आणि पटकथेचा गाभा समजून सांगण्यात खर्ची होतो. सिनेमात प्रामुख्यानं दोन व्यक्तींचं द्वंद्वं असल्यानं पटकथेला काही अंशी मर्यादा येते. परंतु आई (नीता शेंडे) आणि सागरची होणारी बायको मयुरीच्या (पायल जाधव) निमित्तानं पटकथेत दोघात तिसऱ्याचा दृष्टिकोन लेखकानं पेरण्याचा प्रयत्न केलाय. शहरातील नोकरी सोडून सागर पुन्हा आपल्या गावी आलाय. लग्नाचं वय उलटून जाण्याच्या उंबरठ्यावर आता त्याचं लग्न ठरलं आहे. लग्नासाठी तो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. दरम्यान, काही कारणांमुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांमध्ये मतभेद आहेत. अशातच भावकीत आणि नातेवाईकांना लग्नाच्या पत्रिका घरोघरी, गावोगावी जाऊन द्यायच्या आहेत. पण, तात्या आणि सागरला एकत्र एकमेकांबरोबर जायचं नाहीय. कारण, त्यांचं एकमेकांशी पटत नसतं. शब्दाला-शब्द वाढतो आणि त्यांच्यात नेहमीच वाद होत असतो. बापाचं दुःख सागरला समजत नसतं आणि तात्यांना त्यांच्या मुलाचं दुखणं उमजत नसतं. त्यामुळे त्यांचं तोंड नेहमीच विरुद्ध दिशेला असतं. आता लग्नाच्या पत्रिका गावोगावी कोण वाटायला जाणार? इकडून या रंगतदार सिनेमाची कथा सुरू होते. परिस्थितीच्या रेट्यानं तात्या आणि सागरला एकमेकांचे चेहरे पाहत पत्रिका वाटण्यासाठी गावोगावी फिरावं लागतं. याच प्रवासात पितापुत्राच्या नात्याची उलगडत जाणारी घडी दिग्दर्शकानं सुचकतेनं पडद्यावर मांडली आहे. अनेक प्रसंग अत्यंत हळवे आणि बोचणारेदेखील आहेत. इतर नात्यांची असलेली उपकथानकं सिनेमाचा डोलारा अधिक फुलवतात. असं असलं तरी सिनेमाचा वेग त्याचा प्रभाव काही अंशी कमी करतो. मकरंद माने आणि विठ्ठल काळे यांनी लिहिलेले संवाद सिनेमाचा पोत समजून घेण्यासाठी पुरेसे आहेत. अगदी एका भावनिक द्विपात्री नाटकाप्रमाणे 'अॅक्शन-रिअॅक्शन'चा सामना पडद्यावर रंगतो. विठ्ठल आणि शशांक शेंडे यांचा पडद्यावरील वावर आपल्याला कथानकात परिणामी सिनेमात गुंतवून ठेवतो. सोबतीला गुरु ठाकूर, वैभव देशमुख यांचे शब्द आणि विजय गवंडे याचं संगीत सिनेमाला श्रवणीय करतात. विजय गवंडे या संगीतकाराच्या संगीतानं पडद्यावरील अनेक भावनिक प्रसंगांना जिवंत केलं आहे. नेहमीप्रमाणे शशांक शेंडे यांनी त्यांची तात्या ही भूमिका उत्तम साकारली आहे. तर विठ्ठल काळे यानं सागर ही व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे निभावली आहे. परंतु, त्याच्या पडद्यावरील वावरात एकसुरीपणा आहे; जो यापूर्वी त्याच्या 'पुनःश्च हरिओम' सिनेमात दिसला होता. बाप-लेकाच्या नात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच अंतर्मुख करेल. दिग्दर्शक मकरंदनं आजवरच्या त्याच्या चित्रपटांमधून नात्यांचे पैलू उलगडून दाखवले आहेत. या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला; तसाच 'बापल्योक'देखील आहे. सिनेमाची मांडणी वास्तविक आहे. एरवी बाप-मुलातील संघर्ष म्हणजे शाब्दिक किंवा भावनिक हाणामारी. पण, अगदी 'सिम्बॉलिक' पद्धतीनं दिग्दर्शकानं हे नातं पडद्यावर उलगडलं आहे. भावनिक असलेला हा सिनेमा काही ठिकाणी विनोदीदेखील होतो. लेखक-दिग्दर्शकाला काय म्हणायचंय, ते प्रेक्षकापर्यंत नेमकं पोहोचतं. कलाकारांनी केलेल्या नेमक्या कामामुळेच तो आशय अधिक ठाशीवपणे पोहोचतो. सगळ्याच कलाकारांनी मस्त कामं केली आहेत. सिनेमातल्या बाकीच्या तांत्रिक बाबीही उत्तम जमलेल्या आहेत. परंतु विषयाची मूळ मांडणीच नेमकी असल्यानं सिनेमा जमून आला आहे. सिनेमाच्या शेवटी बापाच्या चपला मुलगा स्वतःच्या पायात घालतानाच्या प्रसंगामुळे सिनेमाची गोष्ट पूर्णत्वास जाते.

जन्मदिन

स्मृतिदिन

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया