अतिथी कट्टा

दिनांक : ३१-०१-२०२०

‌‌‌‌‌‌‌‌‌‘दिग्दर्शनासाठी ठराविक प्रगल्भता आवश्यक – मृण्मयी देशपांडे



लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित नातेसंबंधांचा खरा अर्थ सांगणारा ‘मन फकीरा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित होत आहे. मृण्मयी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाबद्दल मृण्मयीचं हे मनोगत.

——

‘मन फकिरा’ हा ट्रेंडसेटिंग चित्रपट असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो आणि आजची पिढी ज्या नातेसंबंधांकडे खुल्या नजरेने पाहते, त्याच्याबद्दल बोलतो. आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न बघता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे. मला वाटतं, आजच्या युवा पिढीसाठी लग्नाच्या व्याख्या बदलल्या आहेत. ते एक बंधन न राहता त्या आणखीन खुल्या आणि प्रगल्भ झाल्या आहेत. केवळ बंधन न वाटता या माणसाबरोबर आयुष्य काढता येणं शक्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा सोडवून मग या गणितामध्ये उतरण्याचा विचार ही युवा पिढी करते आणि खर्‍या अर्थाने जोडीदार या शब्दाची व्याख्या किंवा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न ते या लग्नामध्ये शोधत असतात मग ते योग्य तो निर्णय घेऊन ही सीमा ओलांडतात.”

मला नेहमीच दिग्दर्शक व्हायचे होते. गेली दहा वर्षे माझ्या मनात ही गोष्ट घोळत होती. दिग्दर्शन काही माझ्यासाठी नवीन नाही. कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षाला असताना मी एक नाटक दिग्दर्शित केले होते. त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे बक्षीस मिळाले होते.

तेव्हापासून माझ्या डोक्यात दिग्दर्शनाचे वेड घोळत होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होते. दिग्दर्शनासाठी एक ठराविक प्रगल्भता लागते. तुम्ही तुमच्या जीवनप्रवासात शिकत जाता. एकेक प्रसंग हाताळताना त्यातून ही प्रगल्भता येते आणि त्यातून तुम्ही दिग्दर्शनासाठी सज्ज होता. मला त्याबाबत आत्मविश्वास आला आणि दिग्दर्शनाचे हे पाऊल टाकले. मला नातेसंबंध हा विषय आणि त्यातील गुंता खूपच भावतो. मला माणसे त्यांच्या नजरेतून, त्यांच्या देहबोलीतून पारखता येतात. मानवी नातेसंबंध हे खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याचा विषय आहे. हे नातेसंबंध नीट आणि सहजपणे मांडता आले तर अधिक रंजक बनतात. हे नातेसंबंध व्यक्त करण्याची संधी या कथेतून साधली आहे. हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असल्याने माझ्यासाठी खूपच जवळचा आहे. बदलत्या मराठी प्रेक्षकवर्गाला आणि त्यातही युवा पिढीला तो खूप भावेल, याची मला पूर्ण खात्री आहे.

सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पर्पल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानू, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी यांची आहे.

– मृण्मयी देशपांडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया