अतिथी कट्टा

दिनांक : १७-१०-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌‘हिरकणी’द्वारे स्त्रीत्वाला, मातृत्वाला सलाम – प्रसाद ओक




इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. ‘आई’ या शब्दांच सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्रीच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज काळ्याकभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणाऱ्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. येत्या २४ तारखेला हिरकणीच्या साहसावर आधारलेला ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यानिमित्तानं या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक यांचं हे मनोगत.

——

साधारण दोन वर्षांपूर्वी मी माझा ‘कच्चा लिंबू’ नावाचा एक वेगळ्या जॉनरचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या विषयावरचा तो चित्रपट होता. विविध पुरस्कारांपासून ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतही तो जाऊन पोचला होता. त्याला जेवढा रसिकाश्रय मिळायला हवा होता, तो दुर्दैवानं मिळाला नाही. त्यानंतर मात्र मी असं ठरवलं होतं की, माझा दुसरा चित्रपट असा असेल की जो महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आवडेल. तसा जिव्हाळ्याचा विषय आपण निवडायचा असं मी ठरवलं. महाराष्ट्रात सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरिक्त असूच शकत नाही. छत्रपती शिवरायांशी निगडीत असलेला विषय मी शोधत होतो आणि हिरकणीचा विषय मला सापडला. या विषयावरचा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो याची मला कल्पना होती. त्याच्यासाठी तगड्या निर्मात्याची गरज होती. जो राजेश मापुस्करांच्या रुपातून मिला मिळाला. चांगला लेखक मला हवा होता, तर चिन्मय मांडलेकरसारखा उत्तम लेखक माझ्या घरातलाच आहे. प्रताप गंगावणे यांनी लिहिलेल्या कथानकाला चिन्मयच्या पटकथा-संवादांमुळे त्यामुळे माझा दुसरा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत नक्कीच वेगळ्या वाटेवरचा आहे. सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा चित्रपट मला बनवायचा होता, तो हिरकणीच्या रुपातून बनलाय असं मला वाटतं.

१६७४ सालचं कथानक या चित्रपटाला लाभलं आहे. हा इतिहास बहुतेकांना ज्ञात आहेच. परंतु, नवीन पिढीला चित्ररुपातून काहीतरी नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. हिरकणी काही कारणानिमित्तानं रायगडावर अडकते. तिचं सहा-आठ महिन्यांचं तान्हं बाळ रायगडाच्या पायथ्याशी झोपडीत एकटंच असतं. आपल्या मुलाच्या चिंतेपायी ती रायगडाचा अख्खा बुरुज रात्रीच्या अंधारात काही तासांमध्ये उतरते. हा तिचा प्रवास, ही तिची हिंमत, हे तिचं धाडस या सगळ्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. कुठलीही आई आपल्या मुलासाठी वेळप्रसंगी काहीही करू शकते. मातृत्वाला, स्त्रीत्वाला या चित्रपटामधून सलाम करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटाचं मार्केट नाही. मराठी चित्रपटाचं कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगवेगळा असला तरी कधी कधी आवडीची जातकुळी सारखी होते नि एकाच विषयाचे, पद्धतीचे चित्रपट बनवले जाऊ शकतात. या चित्रपटाचं संगीत खूप वेगळं आहे. त्यातलं शिवराज्याभिषेक गीत तर सर्वात उत्तम जमून आलं आहे. शिवराज्याभिषेक’ म्हणजे एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण… ‘हिरकणी’ सिनेमातील ‘शिवराज्याभिषेक गीत’ नुकतेच लाँच झाले आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात ९ कलाकार ६ लोककला सादर करताना दिसतात. ते ९ कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ चांदेकर, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग, सुहास जोशी आणि संगीतकार राहुल रानडे. कविभूषण, संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर अमितराज यांनी संगीत दिले आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दिपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी आणि संतोष बोटे यांनी हे गाणे गायले आहे. खूप वेगळे फॉर्म्स आहेत त्यात. संगीताचा सुफी फॉर्मही यात पाहायला मिळेल. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतल्या मान्यवर कलाकारांना मी त्यात स्थान दिलं. अत्यंत प्रेमाळू बाईच्या भूमिकेत मला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशीच दिसल्या. एक जोडपं हवं होतं ते मला क्षिती आणि हेमंतच्या रुपात मिळालं. धनगराच्या रुपात मला प्रियदर्शन जाधव दिसला. वारकरी चिन्मय मांडलेकर झालाय आणि सूफी गीत गाण्यासाठी जितेंद्र जोशीशिवाय दुसरा कोणता चॉईस असूच शकत नाही.

– प्रसाद ओक

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    निशांत भोसले


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात. पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया