अतिथी कट्टा

दिनांक : ०३-०९-२०२१

खलनायकांचा मेरुमणी – जयशंकर दानवे



आजादीच्याही आधीच्या काळापासून कितीतरी सुपरहिट मराठी चित्रपटामुळे आपली ओळख कायम ठेवणारे कलाकार जयशंकर दानवे.त्यांनी तब्बल ५ दशके फिल्म,थिएटर,स्टेज आर्टिस्ट आणि दिग्दर्शक म्हणून केलेली कारकीर्द मराठी फिल्मक्षेत्रात एक उदाहरण म्हणून आजही आठवण केली जाते.

——

त्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९११ रोजी महाशिवरात्रीला झाला. हा माणूस कोणत्या मातीतून घडला होता?कुठले संचित घेऊन जन्माला आला होता? वयाच्या बाराव्या वर्षी आई-वडिलांच्या मायेची पाखर सोडून नाटकात काम करायच्या तीव्र इच्छेनं घरातून पळून जाऊन आर्य सुबोध नाटक मंडळीत हरकाम्या म्हणून दाखल झालेल्या या कलावंताने जन्मभर कलेची साथ सोडली नाही. मोहमयी दुनियेचे रंग ठाऊक नसलेल्या या कलाकाराने नाटकाच्या वेडापायी या अत्यंत बेभरवशाच्या व्यवसायात पाऊल टाकलं आणि कलोपासनेची दुष्कर वाट चालण्याचा वसा घेतला. घरादारावर तुळशीपत्र ठेवून या एकांडया शिलेदारानं जिद्दीनं कलाप्रवास सुरु केला. आर्य सुबोध नाटक मंडळीत‘ असिरे-हवीस,लैला मजनू,कटोरा मांगे खून,शिरी फरहाद,चलता पुर्जा,इत्तेफाक,नेकी और बदी,आवाज,कत्लेआम ’ यासारखी उर्दू नाटके त्यांनी गाजविली.राणी चंद्रावती,पतितोद्धार सारख्या मराठी नाटकांतील त्यांच्या भूमिकाही त्याकाळी अप्रतिम झाल्या होत्या. हैद्राबाद,औरंगाबाद अशा ठिकाणी ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून त्यांनी एक काळ गाजवला होता.एकाच नाटकाच्या प्रयोगात हैम्लेटची आई व प्रेयसी अशा स्त्री भूमिकाही त्या काळात त्यांनी साकारल्या होत्या.त्यावेळी आर्य सुबोध नाटक मंडळीच्या दर महिन्यात वीस-वीस उर्दू व मराठी नाटकांत ते कार्यरत असायचे.

१९३४-३५ साली दानवे कोल्हापुरात सरस्वती सिनेटोन मध्ये नायक म्हणून दाखल झाले.त्यानंतर शालिनी सिनेटोनच्या ‘असिरे हवीस’ या उर्दू चित्रपटातील नायक त्यांनी रंगवला.त्यानंतर बाबुराव पेंटरांच्या ‘उषा,प्रतिभा,सावकारी पाश’ अशा चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. उर्दू रंगभूमीवरून त्यांना मराठीत आणले ते भालजी पेंढारकरांनी. पण ते केवळ नट म्हणून मराठीत आले नाहीत.उर्दू रंगभूमीवरून त्यांना मराठीत येताना भालजी पेंढारकरांनी त्यांच्यातला नट जरूर पाहिला होता.१९३७ साली शालिनी सिनेटोनच्या ‘कान्होपात्रा’ या चित्रपटात भालजींनी चिंतामणराव कोल्हटकरांच्या सोबत प्रथमच सहाय्यक खलनायकाची भूमिका त्यांना दिली.त्यानंतर ते जयप्रभा स्टुडीओत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून
दाखल झाले.

कोल्हापूरचे कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचा आज ३६वा स्मृतिदिन. ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला आणि ज्यांनी कोल्हापूरच्या नाट्यकलेची धुरा यशस्वीपणे सांभाळली असे मराठी रंगभूमीचे दिग्दर्शक व कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.त्यांनी रुपेरी पडदाही आपल्या खलनायकी अभिनयाने गाजवला.पुण्यात जन्माला आलेल्या जयशंकरजींनी सिनेमा-नाटकाच्या वेडापायी घरादारावर तुळशीपत्र ठेवले आणि त्यांना सावलीचे झाड भेटले बेंजामिन साहेबांच्या रूपाने. त्यांच्यामुळे हिंदी उर्दूवर प्रभुत्व गाजवलेले जयशंकरजी रुस्तुम मोदी यांच्या ‘आर्य सुबोध’ नाटक कंपनीत दाखल झाले. त्याकाळात या कंपनीची एका महिन्याला २०-२० वेगवेगळी हिंदी-उर्दू-मराठी नाटके सादर होत.त्यात विविध भूमिका पार पाडत असताना त्यांना दिग्दर्शनाची हातोटी गवसली.

सरस्वती सिनेटोन,शालिनी सिनेटोन येथे प्रथम नायक म्हणून त्यांनी हजेरी लावली. बाबुराव पेंटर सारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली हा प्रवास सुरु झाला.‘सावकारी पाश’ या पहिल्या मराठी बोलपटात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.त्यानंतर ‘उषा’, ‘प्रतिभा’, ‘गोपीचंद’, ‘माझी लाडकी’, ‘भगवा झेंडा’, ‘देवयानी’, ‘नारद नारदी’ अशा अनेक चित्रपटानंतर भालजी पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली ‘संत कान्होपात्रा’ या चित्रपटात नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर या खलनायकाचे हस्तक म्हणून त्यांनी प्रथमच खलनायकी भूमिका साकारली आणि मग ही खलनायकी भूमिका त्यांना चिकटली. बाबांच्या ‘मीठभाकर’ चित्रपटातील सुंदरराव सातपुते हा खलनायक आजही जुनी जाणते लोक स्मरतात. त्यांनी ‘बहिर्जी नाईक’, ‘थोरातांची कमळा’, ‘सासुरवास’, ‘सूनबाई’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ या सारख्या जयप्रभा स्टुडीओतील चित्रपटाव्यतिरिक्त ‘भाव तेथे देव’, ‘गावची इज्जत’, ‘वरदक्षिणा’, ‘सुभद्राहरण’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘धनंजय’, ‘फकीरा’, ‘कोर्टाची पायरी’, ‘सुरंगा म्हणत्यात मला’, ‘लाखात अशी देखणी’, ‘एक माती अनेक नाती’, ‘रंगू बाजारला जाते’, ‘डोंगरची मैना’, सख्या सजणा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘आम्ही जातो आमुच्या गावी ’ अशा दिनकर द.पाटील, अनंत माने, होमी वाडिया, कमलाकर तोरणे या दिग्दर्शकांच्या चित्रपटातूनही दर्जेदार खलनायक साकारला.

त्यांचे शेवटचे दोन चित्रपट दादा कोंडके दिग्दर्शित ‘आंधळा मारतो डोळा’ आणि प्रभाकर पेंढारकरांचा ‘प्रीत तुझी माझी’. त्यांनी एकूण ६७ चित्रपटात अभिनय केला.हा खलनायकी रोल सांभाळतानाच त्यांनी जयप्रभा स्टुडिओत भालजींचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरु केला. जयप्रभा स्टुडिओमध्ये कोणताही कलाकार प्रथम जयशंकरजींच्याकडे तालमी करत असे आणि मग त्याला भालजींच्या समोर उभे केले जात होते हा त्यावेळचा शिरस्ता होता.म्हणूनच सुलोचना, रमेश देव, चंद्रकांत, सूर्यकांत, शांता जोग, राजशेखर, गणपत पाटील, रत्नमाला हे त्यावेळचे नवखे कलाकार प्रथम जयशंकर दानवेंच्या तालमीत तयार झाले.

१९४६ साली जयप्रभा स्टुडीओतील हिंदी ‘वाल्मिकी’ चित्रपटासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमन राजकपूर यांना प्रथम अभिनय शिकवण्याची संधी त्यामुळेच जयशंकरजींना मिळाली.राजकपूर घडले ते प्रथम त्यांच्या दिग्दर्शनाखाली.तसेच सुलोचनादीदी सारख्या दिग्गज अभिनेत्रीला पहिला अभिनयाचा पाठ त्यांनीच दिला.त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जयभवानी’ चित्रपटात दीदींचा नायिका म्हणून प्रथम रुपेरी पडद्यावर प्रवास सुरु झाला. त्याआधी ‘करीन ती पूर्व’ या नाटकातून त्यांनी दीदींना रंगभूमीवरही प्रथम आणले.गणपत पाटील यांना नाच्याच्या भूमिकेसाठी निवडताना जयशंकरजींनी ‘ऐका हो ऐका’ या नाटकात प्रथम नाच्याची पहिली टाळी शिकवली आणि राजशेखरना आपल्या खलनायकी अभिनयाचा साथीदार करून घेतले.हिंदी व मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील महान कलाकार विक्रम गोखले यांना रंगभूमीवर ‘रायगड गातो शंभू गाथा’ या नाटकात अभिनय शिकवून प्रथम संधी दिली.

चित्रप्रवास सुरु असतानाच त्यांनी कोल्हापूरातील देवल क्लब, करवीर वाचन मंदिर, करवीर भगिनी मंडळ, मेडिकल असोसिएशन, शुगरमिल-जीवन कल्याण अशा संस्थांची दर्जेदार नाटके दिग्दर्शित करून अनेक कलाकारानाच नाही तर अनेक मध्यमवर्गीयांनाही रंगमंचासाठी सक्षम बनविले. तसेच विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीना सुद्धा पद्माराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल ,विवेकानंद कॉलेज अशा संस्थाच्या माध्यमातून नाटकात अभिनय करण्यास प्रवृत्त केले.आज अनेक त्यांचे विद्यार्थी अन शिष्य सिने-नाट्य क्षेत्रात कार्यरत असून आपल्या या गुरूविषयी भरभरून बोलतात.आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून कलानगरीतील नाट्य वारसा त्यांनी जिवंत ठेवला,चालता बोलता ठेवला हे त्यांचे योगदान स्मरणीय तर आहेच पण वाखाणण्याजोगेही आहे. त्यांनी जवळजवळ १३४ नाटकांतून व त्यांच्या असंख्य प्रयोगातून अभिनयाचा वारसा जपला.

चित्रपटांत,नाटकांत खलनायकाच्या भूमिकेत असल्यामुळे प्रेक्षकांच्या रागाचे धनी होणारे जयशंकर जगाच्या रंगभूमीवर मात्र एक मनस्वी कलावंत म्हणून वावरताना कोल्हापूरच्या जनतेने पाहिलेत.कलेवरील प्रामाणिक निष्ठा,उदयोन्मुख कलावंताना पुढे आणण्यासाठी धडपड त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू ठेवली.

रंगभूमी,चित्रपट क्षेत्रात व्रतस्थ राहून स्वच्छ व पारदर्शक अशा चारित्र्याने ते वावरले.कलावंताच्या जीवनातील चढउतार त्यांच्याही वाट्याला आले;पण कलेवरील निष्ठेने त्याची त्यांनी कधी फिकीर केली नाही.त्यांनी अनेक नाटके, कादंबऱ्या,पटकथा,एकांकिका,लघुकथा इतकेच नव्हे तर तीन खंडात ‘ हिरवी चादर रुपेरी पडदा’ हे त्यांचे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.

जयशंकर भक्तिभावाने कला सादर करीत राहिले.कुणी क्रेडीट दिले वा न दिले त्याचा हिशेब त्यांनी ठेवला नाही,तसेच आज मोठ्या झालेल्या कलावंतानीही त्यांची आठवण ठेवली नाही.पण कोल्हापुरातील अनेक लहान-मोठे कलावंत मात्र याचा उल्लेख अभिमानाने करतात.दानवे परिवारांने आपल्याला लाभलेल्या परीसस्पर्शाची आठवण स्मृतीरूपाने गेली ३५वर्षे जपली आहे.दानवे बंधू-भगिनी दरवर्षी आपल्या या थोर पित्याच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कला,साहित्य क्षेत्रांतील मंडळीना पाचारण करतात व करवीरकरांना एक दर्जेदार कार्यक्रमाची भेट गेली ३५वर्षे देतात.आजपर्यंत शन्ना नवरे,माधवी देसाई,अनंत दीक्षित,शिरीष कणेकर,नटवर्य प्रभाकर पणशीकर,विक्रम गोखले,मोहन जोशी,श्याम भुर्के,रामदास फुटाणे,फ.मुं.शिंदे,सुधीर गाडगीळ ही मंडळी स्मृतिदिनानिमित्त आले होते.तसेच परिवाराने २०११ सालापासून ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ सुरु केले.रंगकर्मी दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,सदाशिव अमरापूरकर,शरद
पोंक्षे,अरुण नलावडे,सुबोध भावे,प्रशांत दामले,डॉ.गिरीश ओक,भरत जाधव,अविनाश नारकर,ऐश्वर्या नारकर,महेश कोठारे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. करवीर नगरीतील अनेक कलावंत या समारंभात भक्तिभावाने हजेरी लावतात.नव्या पिढीच्या नव्या विचारांत हरवू पाहणारी जयशंकर दानवेंसारख्या थोर कलाकाराची आठवण करून देण्यासाठी आमच्या परिवाराने घेतलेला हा अवघड वसा वर्षानुवर्षे असाच पार पडावा ही परमेश्वरचरणी प्रार्थना !

– जयश्री जयशंकर दानवे

ज्येष्ठ लेखिका,कोल्हापूर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया