अतिथी कट्टा

दिनांक : १३-०७-२०२०

निळूभाऊ…



दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा १३ जुलै हा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं साधना दिवाळी १९९९ अंकामधील नि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची निर्मिती असलेल्या ‘निळू फुले – व्यक्ती, कलाकार, कार्यकर्ता’ या डॉ. वि. भा. देशपांडे संपादित पुस्तकामधील निळू फुले यांच्यावर विख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेला लेख आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत.

——

१९६९च्या जानेवारीत मी आफ्रिकेतून भारतात परत आलो. तीन वर्षे भारतापासून दूर होतो. वैद्यकीय व्यवसाय बंद करून व्यावसायिक नट होण्याचा निर्णय घेऊनच परतलो होतो. तेव्हा आल्याबरोबर रंगभूमी आणि चित्रपट या क्षेत्रांची चाचपणी सुरू केली. रणमैदानात पाऊल घालण्यापूर्वी युद्धपरिस्थितीचा नीट अंदाज घेणे आवश्यक होते !

‘काशीनाथ’चे ‘अश्रूंची फुले’ पाहिले. काशीनाथचा अभिनय चांगलाच अतिरेकी झाला होता. ‘अबोल झाली सतार’ नावाचा दारव्हेकरांच्या एका नाटकाचा प्रयोग पाहिला. नाटक अगदीच सामान्य होते, पण अतिशय शिस्तीत बांधलेला, सुविहित प्रयोग मराठी व्यावसायिक रंगभूमीवर मी प्रथमच पाहिला. खूप बरे वाटले. गुलजारचा ‘अचानक’ हा चित्रपट पाहिला. हिंदी चित्रपटात क्रांती झाल्यासारखेच वाटले ! दादा कोंडक्यांची ‘विच्छा’ पाहिली. दादांचा भन्नाट मोकळा-ढाकळा अभिनय पाहून अगदी हरखून गेलो आणि मग निळू फुल्यांचे ‘कथा अकलेच्या कांद्याची ‘ हे वगनाट्य पाहिले आणि थक्कच झालो !

लीला गांधींचे नृत्य तर अद्भुत होतेच; पण निळूभाऊंचा अभिनय (त्यातली ‘हिप्पी’ची भूमिका सोडता )- विलक्षणच होता. मी असले काहीच मराठी रंगभूमीवर पाहिले नव्हते ! चाळीसच्या दशकापासून मी मराठी रंगभूमीवरचे खूप मोठे नट पाहिले होते; पण हे बेणे’ काही वेगळेच होते; अत्यंत सुनियंत्रित आणि तरीही अगदी उत्स्फूर्त वाटणारा तो अभिनय होता. डोळे, भुवया, ओठ, गाल, पापण्या या चेहऱ्यावरच्या अवयवांच्या अगदी सूक्ष्म पण आशयसंपन्न हालचालींनी फारच मोठा परिणाम तो साधत होता, रंगभूषेत अत्यल्प बदल करून, केवळ चेहऱ्याच्या संयत हालचाली आणि वाणीचा हुकमी वापर करून, दोन-तीन व्यक्तिरेखांचे वेगळेपण, निळूभाऊ आगदी लीलया पण ठसठशीतपण उभे करीत होते.

फार सुंदर काही तरी पाहिल्याचा आनंद घेऊन मी घरी गेलो, निळूभाऊंचा फॅन झालो. मी निळूभाऊंबरोबर काम करतो आहे – जास्त करून चित्रपटात, पण नाटकात आणि सामाजिक चळवळीतही; पण माझ्या ‘पंखेपणाला’ खोट यावी असे काहीही निळूभाऊंच्या हातून घडलेले नाही! ( एक गंमतीची गोष्ट म्हणजे, आम्ही दोघेही मूलतः नाटकवाले असलो तरी गेल्या तीस वर्षांत आम्ही फक्त तीनदा नाटकात एकत्र आलो. ८७ साली ‘लनाची बेडी’त, ९२ साली (इंग्रजी !) ‘कमला’त आणि ९७ साली ‘प्रेमाची गोष्ट ‘मध्ये आणि त्यातले पहिले दोन प्रसंग नाटकापेक्षा सामाजिक चळवळीशी जास्त संबंधित होते! )

निळूभाऊंची फार नाटके मी पाहिलेली नाहीत. फार नाटके, मला वाटते त्यांनी केलीही नाहीत. ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’ आणि अलीकडेच ‘रण दोघांचे ‘ एवढीच मी पाहिली. ‘कबूतर’ मधला त्यांचा अभिनय खूप ‘टाळ्याखाऊ ‘ होता. ( ती व्यक्तिरेखाच तशी भडक होती. ) पण धादांत मेलोड्रामासुद्धा किती वास्तवाच्या पातळीवर खेचता येतो, याचा तो मूर्तिमंत धडा होता. ‘सूर्यास्त ‘मधला, अगदी स्फोटाच्या काठावर वावरणारा म्हातारा ध्येयवादी अप्पाजी उभा करताना सेवादलाचे भाऊ रानडे आणि सेनापती बापट या दोन महान व्यक्तिमत्त्वांचे असे बेमालूम मिश्रण निळूभाऊंनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात केले होते की गुंग होऊन पाहात राहावे !

‘बाईंडर’ मधला निळूभाऊंनी उभा केलेला ‘सखाराम’ हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाविष्कारांपैकी एक आहे – केवळ भारतीय रंगभूमीवरचा नव्हे तर जागतिक रंगभूमीवरचा ! बाईंडर’ हे माझे अत्यंत आवडते नाटक. ते दिग्दर्शित करण्याची माझी फार इच्छा होती; पण सफल न झाल्याने मनात थोडी अढी घेऊनच मी प्रयोग पहायला गेलो होतो. निळूभाऊ काम उत्तम करणार याबद्दल मनात शंका नव्हतीच. पण निळूभाऊंचा सखाराम मनात आणि डोळ्यांत न मावण्याइतका अक्राळविक्राळ होऊन जेव्हा समोर उभा राहिला तेव्हा अगदी अभावितपणे त्यांचे पाय धरावेसे मला वाटले !

एक गंमतीची आठवण आहे. मी आणि तेंडुलकर (विजय) एकदा पुण्याहून मुंबईला चाललो होतो. गाडीत शेजारी शेजारी बसलो होतो. बोलता बोलता तेंडुलकर म्हणाले, “एक नवीन नाटक लिहायला घेतले आहे. त्यात तुम्ही आणि निळूभाऊंनी काम करावे असे माझ्या मनात आहे.” असे म्हणून त्यांनी बॅगेतून लिखाणाचे कागद काढून माझ्या हातात दिले आणि म्हणाले, “वाचून पहा. नाटकाचे नाव आहे ‘घाशीराम कोतवाल’. तुम्ही घाशीराम आणि निळूभाऊ नाना फडणीस – असे माझ्या मनाशी आहे !” मी अधाशासारखे वाचले. मला वाटते जेमतेम अर्धा-पाऊण अंक असेल, पण आपण काहीतरी अफलातून वाचतो आहोत, हे जाणवले.

पुढे जगप्रसिद्ध झालेल्या या नाटकात मी आणि निळूभाऊ एकत्र आलो असतो तर? या विचाराशी मी आजही कधीकधी खेळत असतो! नाटकचे जमले नाही, पण लवकरच आम्ही दोघे एकत्र येण्याचा योग आला तो ‘पिंजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटात. मी चित्रपटात अगदीच नवखा – आणि निळूभाऊ स्टार. पण प्रमुख भूमिका माझी होती आणि निळूभाऊंची भूमिका दुय्यम होती. मी संपूर्ण पटकथा वाचलेली असल्याने इतकी दुय्यम भूमिका निळूभाऊंनी स्वीकारली याचे मला जरा आश्चर्यच वाटले होते, पण त्या निमित्ताने का होईना, एकत्र काम करायला मिळेल हा आनंद होता.

चित्रपटात आमचे एकत्र काम फार नव्हते; त्यामुळे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी एकत्र काम करायची फारशी संधी मिळायची नाही. पण आमच्या चित्रपटातला खलनायक जो होता तो कोल्हापूरचा स्थानिक कलावंत होता आणि हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमची दया येऊन म्हणा, की निळूभाऊंच्या मैत्रीमुळे म्हणा, तो बऱ्याच वेळा रात्री आम्हा दोघांना त्याच्या घरी जेवायला बोलवायचा. त्या वेळच्या अनौपचारिक मैफलीत निळूभाऊ या व्यक्तीच्या जरा जवळ जाता आले.

एक गोष्ट त्या मैफलीत नित्यनेमाने घडे. पहिला अर्धाएक तास निरनिराळ्या विषयांवर गप्पा होत. साहित्य, संगीत, तमाशा, कुठलाच विषय वर्ज्य नसे. एरवी अबोल, बुजरे वाटणारे निळूभाऊ सर्व विषयांत रसिकतेने आणि जाणकारीने बोलत. पण सुमारे अर्धा तासानंतर ते एकदम स्वत:चे पार्लमेंट भरवीत. त्यात जवाहरलाल नेहरूंना आवर्जून बोलवत आणि स्वतः राममनोहर लोहिया बनून ते अत्यंत अन्पार्लमेंटरी भाषेत नेहरूंचे वाभाडे काढीत ! मी उगीच दुबळेपणाने नेहरूंची बाजू घेत असतो असे पाहून एकदा त्यांनी मला सुनावले – ( अगदी माझी कीव करीत सुनावले ) “डॉक्टर, तुम्ही फक्त ‘महाराष्ट्र टाईम्स’ वाचता म्हणून असं बोलता. तुम्ही लोहिया वाचला पायजेलाय. एरवी अगदी ऋजु, जवळजवळ ओशाळे वाटणारे निळूभाऊ अशा वेळी अगदी वेगळ्याच अवतारात दिसायचे – स्फोट होऊ मागणारा ज्वालामुखी आत खदखदत असल्यासारखे भासायचे. त्या वेळीच मला निळूभाऊंच्या समर्थ अभिनयाची किल्ली हाताला लागल्यासारखी वाटली!

राजकारणात निळूभाऊंना नुसता रस नव्हता तर राजकारण निळूभाऊंच्या अंगात चांगले भिनले होते. लोहियांच्या राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक विचारांनी त्यांना झपाटले होते. लोहियांचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध कधीच आलेला नाही. टीव्ही. वर सुद्धा मी त्यांना पाहिलेले नाही. पण त्यांची अनेक प्रकाशचित्रे आणि त्यांची भाषणे वाचून त्यांची एक प्रतिमा मनात तयार झालेली आहे. अतिशय जळजळीत, जहाल आणि तितकेच ऋजु, हळुवार, विनोदाची खूप सूक्ष्म पण सखोल जाण असणारे आणि कारुण्याने गदगदून गहिवरणारे – असे हे चित्र माझ्या मनात आहे. त्याच्या खूप जवळ जाणारे निळूभाऊंचे व्यक्तिमत्त्व आहे आणि लोहियांचा प्रखर बुद्धिवाद निळूभाऊंच्यात नसल्याने निळूभाऊंचे व्यक्तिमत्व खूप लोभसवाणे झालेले आहे !

निळूभाऊनो अभिनयाचे (अथवा राजकारणाचेही) पुस्तकी शिक्षण घेतलेले दिसत नाही. पण जीवनाच्या पुस्तकातून त्यांनी आपला अभिनय खूप संपन्न आणि समृद्ध केला आहे.

कलावंतांची प्रतिभा ही नेमकी काय चीज आहे हे मला माहीत नाही; पण निळूभाऊंना तिचे अनंत हस्ते देणे आहे हे उघड आहे. मात्र तिच्यावर संस्कारांचे असे काही अलंकार त्यांनी चढवले आहेत आणि ते झळझळीत अलंकार त्यांच्या प्रतिभेशो असे काही एकजीव झाले आहेत, की त्यामुळे निळूभाऊंच्या अभिनवाला अभिजात कलेचे उच्च मूल्य विनासायास प्राप्त होते.

– डॉ. श्रीराम लागू

(सौजन्य – साधना दिवाळी १९९९, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, कॉन्टिनेन्टल प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया