वसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…
१९४७ ते १९७५ या तीस वर्षांच्या कालावधीत वसंतरावांच्या वाट्याला अवघे २० मराठी चित्रपट आले. तरीसुद्धा गंमत अशी, की ज्या महाराष्ट्रीय (मराठी) संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला अशा संगीतकारांत म्हणजे मुख्यत: सी रामचंद्र, एन दत्ता, स्नेहल भाटकर इत्यादी. सर्वांत अधिक मराठी चित्रपट वसंतरावांच्याच वाट्याला आले, असे म्हणावे लागेल. या वीस चित्रपटांत ‘राजकमल’चे तीन चित्रपट होेते. (‘लोकशाहीर रामजोशी’, ‘अमर भूपाळी’ व ‘इये ये मराठीचिये नगरी’) ‘राजकमल’चा ‘लोकशाहीर रामजोशी’ हा जरी वसंतरावांनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट असला तरी, त्यापूर्वी म्हणजे सुमारे त्याच्या अकरा वर्षे आधीच वसंतरावांनी ‘हंस पिक्चर्स’च्या मा. विनायकनिर्मित ‘छाया’ या चित्रपटातील दोन गाण्यांना संगीत दिले होते.
‘छाया’ला सुरुवातीला अण्णासाहेब माईणकरांनी संगीत द्यायला सुरुवात केली ‘चल लगबग’ व ‘कंपित का तव काया’ या दोन गाण्यांना चाली देऊन ते चित्रपट सोडून निघून गेले. मग मा. विनायकांनी त्यांचे जिवलग मित्र म्हणजेच वसंतराव यांना बोलावून घेतले. पण वसंतराव त्या वेळी ‘प्रभात फिल्म कंपनी’त संगीत विभाात काम करत होते. ‘प्रभात’ची शिस्त व नियम त्या काळी फारच कडक होते. तरीसुद्धा वसंतरावांनी आपल्या मित्रासाठी म्हणजेच मा. विनायकांसाठी काम करायचे ठरवले. त्यांनी ‘छाया’मधील ‘शाम माझा पहिला’ व ‘धनहीना ललनांना’ या दोन गाण्यांना अतिशय सुरेख चाली लावल्या. ही दोन्ही गाणी सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकरांनी लिहिली होते. त्यांच्याच कथेवर ‘छाया’ काढला होता. या चित्रपटामधील बाकीच्या गाण्यांना धम्मन खॉंनी संगीत दिले होते. तीन संगीत दिग्दर्शक लाभलेला हा पहिलाच चित्रपट. वसंतरावांनी हे संगीत केले ते केवळ विनायकांवरील प्रेमापायी! पण हा ‘गुपचुप व्यवहार’ असल्यामुळे चित्रपटाच्या श्रेयनामावलीत अर्थातच वसंतरावांचे नाव नव्हते.
१९४९चा ‘साखरपुडा’ हा वसंतराव जोगळेकरांचा चित्रपट होता. यातील गाणी विनोदिनी दीक्षित (पूर्वाश्रमीची विनोदिनी देसाई) यांनी गायली होती. साखरपुड्याची कथा, संवाद मालतीबाई बेडेकरांची (विभावरी शिरूरकर) होती तर गाणी सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठी यांनी लिहिली होती. ‘साखरपुडा’मध्ये ही भट्टी इतकी चांगली जमली होती, की वसंतराव जोगळेकरांनी मालतीबाईंचीच कथा व संजीवनी मराठ्यांची गाणी घेऊन ‘हळदी कुंकू’ नावाच्या चित्रपटाची घोषणा करून त्याचेही संगीत वसंतराव देसाई यांनाच द्यायचे ठरवले. याबरोबरच वसंतराव जोगळेकरांनी स.अ. शुक्लांची कथा व गाणी घेऊन ‘भस्मासूर मोहिनी’ या हिंदी, मराठी पौराणिक चित्रपटाचीही सुरुवात केली. याही चित्रपटाचे संगीत वसंतराव देसाई यांचेच होते. पण दुर्दैवाने ‘हळदी कुंकू’ व ‘भस्मासूर मोहिनी’ हे दोन्ही चित्रपट पुरे होऊ शकले नाहीत.
१९५० सालचा ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ हा आद्य क्रांतिकारकावरचा अतिशय सर्वांगसुंदर चित्रपट! कविवर्य शंकर बा. शास्त्रींनी यातली गाणी लिहिली होती. शास्त्रींची गाणी त्या काळाच्या अनुरूप अशी होती. त्यातल्या भोंडल्याच्या गाण्यात ‘ऐका टोपीवाल्याची शर्थ काढा आगिनगाडीचं तिकीट वाजतंय कडकट कडकट…कडकट’ असा वासुदेव बळवंतांच्या काळातील ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांचा उल्लेख आहे तसेच-
काशीबाई, काशीबाई नवरा कसा?
टोपीवाल्याचा कारकून खासा
शेंडीला मिळाला काट, मिशीला चाट, जानव्याला खुंटी
करितो साहेबाशी येसफेस गोष्टी येसफेस गोष्टी
फिरंगी शिरला घरोघरी बघा या नवलाच्या परी
अशी घरोघरी होत असलेल्या बदलाची दखल घेतली आहे.
पेशवाई संपली तरी तिचा प्रभाव असणारा तो काळ. त्यामुळे काही लावण्या तसेच राष्ट्रप्रेमाची गाणीही त्यात होती. वासुदेव बळवंतांच्या काळाचे भान ठेवूनच वसंतरावांनी त्या काळची वाद्ये वापरून तसे संगीत दिले होते.
तीच गोष्ट चित्रपटातल्या वातावरण निर्मितीची! या चित्रपटातल्या प्रसंगांना खरा उठाव मिळाला, तो त्या काळच्या अस्सल मराठी सजावटीमुळे!
मुंबईच्या एका गुजराती स्टुडिओत ‘वासुदेव बळवंत’चे चित्रीकरण झाले. तिथे ‘त्या काळ’चे मराठी वातावरण दाखवणे खरोखर अवघड होते. पण पुण्याच्या ‘राजा केळकर म्युझियम’चे दि. गं. केळकर यांनी त्यांच्या संग्रहातील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वस्तू पुरवून ‘वासुदेव बळवंत’चे वातावरण जिवंत केले. या चित्रपटाच्या यशाचे निम्मे श्रेय त्यातील वातावरण निर्मितीला आहे.
याच सुमारास आचार्य अत्र्यांची वसंतरावांशी ओळख झाली. आचार्य अत्रे रोज संध्याकाळी त्यांचे परममित्र कृ.पां. कुलकर्णी (नाना) व वनमाला यांच्यासह शिवाजी पार्कवरून चौपाटीवर फिरायला जात.
एके दिवशी समुद्रावरून फिरून परत येत असताना आचार्य अत्रे वनमाला व नानांसह वसंतरावांच्या ‘परिमल’मध्ये आले. अत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मोठ्या आवाजात, ‘‘काय वसंतराव, काय चाललंय?’’ अशी चौकशी केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अत्रे म्हणाले, ‘‘वसंतराव, काही नवीन ऐकवा की.’’
वसंतरावांनी मग त्यांना हार्मोनिमवर नुकत्याच झालेल्या ‘अमर भूपाळी’मधील ‘लटपट लटपट तुझं चालणं’ हे गाणं ऐकवलं. अत्रे ती चाल ऐकून इतके खूष व प्रभावित झाले, की वसंतरावांना पाठीवर थाप मारीत म्हणाले, ‘‘वसंतराव, माझ्या पुढच्या चित्रपटाचं संगीत तुम्ही करायचं!’’
आणि अत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला, लवकरच म्हणजे १९५२ सालीच त्यांनी ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाचे संगीत वसंतरावांवर सोपवले. कष्ट न करता पैसा मिळवून श्रीमंत होण्याचा बेत अखेर कसा अंगावर येतो, याचे सुंदर चित्रण त्या चित्रपटात होते. त्या काळात पुण्यात ‘टिळक पोल्ट्री’ नावाचे एक जुगारी योजनेचे प्रकरण फार गाजले होते. शंभर रुपये देणार्या सभासदाला या योजनेनुसार रोज अर्धा शेर दूध व दोन अंडी मिळत. पुढे या योजनेचे दिवाळे वाजले. अत्र्यांनी त्यावरून आपल्या कथेत ‘कामधेनू डेअरी’ निर्माण करून अनेक विनोद त्यातून निर्माण केले होते.
‘ही माझी लक्ष्मी’त बारा गाणी होती. या चित्रपटाच्या वेळी वनमाला एकदा अत्र्यांना गंमतीने म्हणाली, ‘‘तुमच्या त्या ‘बी.ए.बी.टी.टी डी.(लंडन)’ वर गाणे लिहा की!’’
आणि गंमत म्हणजे अत्र्यांनी त्यावर बसल्याजागी एकटाकी अशी लावणी लिहिली ती म्हणजे-
‘‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, माझे गेले पती |
शिकून आले बी.ए.बी,टी.,बाई, बी.ए.बी.टी॥
याबरोबरच ‘लई दिवसांनी आला तुम्ही रावजी’ अशी ही दुसरी एक लावणी अत्र्यांनी लिहिली.
या दोन्ही फर्मास लावण्यांना तितक्याच ठसकेबाज चाली लावून वसंतरावांनी त्या सुलोचना चव्हाणकडून म्हणून घेतल्या. याशिवाय ‘उठी गोपाळजी, जाई धेनूकडे’ ही पारंपारिक भूपाळी, तर ‘चांदीच्या वाटीत खाई दहीभात’ व ‘जीवाचा जिवलग, प्रेमाचा सागर’ ही साने गुरुजींच्या पत्रीचा प्रभाव असलेली गाणी, त्याचप्रमाणे ‘झरझर झर जा मेघांनो गर्जत गर्जत दाही दिशा’ हे वसंत सबनीसांनी लिहिलेले त्या वेळी ‘नवाकाळ’मध्ये गाजलेले गीतही ‘ही माझी लक्ष्मी’मध्ये होते. मृत मुलाला उद्देशून गायलेले अंगाई गीत ‘शेवटची बाळा माझ्या करी रे अंगाई’ हा तर चित्रपटातला परमोच्च बिंदू होता. अंगाईगीतातील कल्पना, भावना व स्वर एकमेकांना पूरक ठरली. थोडक्यात वसंतरावांचे संगीत अत्यंत हृदयस्पर्शी व भावपूर्ण असे होते. ‘ही माझी लक्ष्मी’त वृंदावन-शुभं करोती हे आत्मीयतेने आणून अत्रे प्रेक्षकांच्या भावनेला पुलकित करतात. कौटुंबिक जीवनातले सौंदर्य आणि मांगल्य त्यांनी या कथेत चितारले होते. दिग्दर्शनातही कौशल्य दाखवले होते. पण इतके करूनही हा चित्रपट म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. ही गोष्ट अत्र्यांना फार लागली. त्यात भरीसभर म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पार्टीतर्फे उभे असलेले अत्रे पराभूत झाले. त्या निराश अवस्थेत त्यांना आठवण झाली ती साने गुरुजींच्या चितेसमोर ‘श्यामची आई’ रुपेरी पडद्यावर आणावयाची प्रतिज्ञा केल्याची!
मग त्यांनी वसंत बापटांच्या मदतीने खंडाळ्याला जाऊन ‘श्यामची आई’ची पटकथा लिहिली. १९५२च्या एप्रिलमध्ये ‘चंपावती’ बोटीने ते हर्णे बंदरात गेले व तिथून गुरुजींच्या पालघर, दापोली इ. भागांत जाऊन ‘श्यामची आई’च्या बाह्य चित्रीकरणाची जागा नक्की केली.
१९५२च्या मे महिन्यात मुंबईच्या בज्योती स्टुडिओ’त ‘श्यामची आई’चा मुहूर्त होऊन चित्रीकरणास सुरुवात झाली. ‘श्यामची आई’तील ‘घनदाट रानी वाहे झुळझुळ पाणी’ हे गाणे कविवर्य वसंत बापटांनी लिहिले.
बाकीची गाणी अत्र्यांनी लिहिली. त्यातील चिंधीचे गाणे आचार्य अत्र्यांनी पूर्ण केले असे म्हणायचे कारण म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन ओळी साने गुरुजींच्या आहेत. याशिवाय राजकवी यशवंतांची ‘आई’ ही कविताही घेतली होती.
‘श्यामची आई’ या अलौकिक चित्रपटाच्या यशाचा वाटा साने गुरुजींच्या अमर कथेत आहे तसाच तो वसंतरावांनी दिलेल्या अमर संगीतामध्येही आहे.
आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘कर्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात वसंतराव देसाईच्या संगीताचे अगदी पोटभरून आणि योग्य तेच कौतुक केले आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘ ‘श्यामची आई’ ही मूळ गोष्ट अतिशय भावनाप्रधान असल्याने ती परिणामकारक होण्यास, तिला अनुकूल आणि प्रभावी संगीताची जोड हवी होती आणि हे संगीत भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीय जीवनाचा परिपोष करणारे असे असायला पाहिजे होते. असे संगीत देण्याचे पावित्र्य व सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे असा एकच संगीत दिग्दर्शक या भारतात आणि तो म्हणजे वसंतराव देसाई! म्हणून मी वसंतराव देसाई यांचे नाव पहिल्यापासूनच माझ्या मनाशी योजून ठेवले होते. पण त्यांच्या पात्रतेइतका पैसा त्यांना द्यावयाला माझ्याजवळ कुठे होता? दोन हस्तक आणि तिसरे मस्तक एवढेच माझ्याजवळ भांडवल. आणि त्या भांडवलाच्या जोरावरच मी वसंतरावांसारखा मोठा कलावंत ह्या चित्रपटासाठी मिळवू शकलो.
‘‘वसंतरावांचे’ दुसरे वैशिष्ठ्य हे, की ते माझ्याइतकेच गुरुजींचे प्रेमी होते. त्यामुळे गुरुजींच्या त्या प्रेमाने त्यांनी ह्या कामाला आत्मीयतेने वाहून घेतले अन् आपले सर्वस्व या चित्रपटात ओतले. त्यांच्या गुणांचे काय वर्णन करावे?
‘श्यामची आई’त अवघी सहाच गाणी आहेत. पण प्रत्येक गाण्याला त्यांनी लावलेली चाल आणि तिची केलेली स्वररचना अविस्मरणीय आहे!
‘चिंधी’च्या गाण्याला वसंतरावांनी जी चाल लावली आहे तिने महाराष्ट्रीय स्त्री गीतांची परंपरा इतकी उज्ज्वल केलेली आहे, की त्या गाण्यातल्या काव्याच्या पोटात संगीत लुप्त होते. हाच संगीत दिग्दर्शकाचा खरा विजय आहे.
‘राजकवी यशवंतांच्या ‘आई’ या महान कवितेला विलक्षण भावनाविव्हल चाल लावून, होनाजी बाळाच्या ‘अमर भूपाळी’ प्रमाणे वसंतरावांनी तिला अमर करून टाकली आहे. त्यामुळे ते गाणे म्हणजे त्या चित्रपटातल्या करुण रसाचा परमोच्च बिंदू ठरतो, तो केवळ वसंतराव संगीत दिग्दर्शक होते म्हणूनच. ह्या चित्रपटातले पार्श्वसंगीत हा तर वसंतरावांच्या प्रतिभेचा दुसरा चमत्कार होय. आपल्या स्वरांच्या जादूने त्यांनी न बोलका भाग बोलायला लावला आणि शब्दाशब्दातून रसाचे फवारे उचंबळायला लावले.
‘चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली दाखवताना जेव्हा साने गुरुजींची मूर्ती पडद्यावर येते. त्या वेळी गाईच्या हंबरण्याचे पार्श्वसंगीत टाकून वसंतरावांनी साने गुरुजींच्या महन्मंगल जीवनाचा सारांशच स्वररूपाने प्रेक्षकांना ऐकवला आहे. म्हणूनच मी म्हणतो, की या चित्रपटाच्या यशाचे अर्धे भागीदार वसंतराव देसाई हेच होत!’’
त्याच वर्षी भालजी पेंढारकरांचा ‘माझी जमीन’ हा चित्रपट संगीतासाठी वसंतरावांकडे आला. नुकताच नवीन कुळकायदा आल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा होत होती. जमीन कुणाची? वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या धनिक जमीनदाराची, की जो स्वत: खपतो त्या शेतकर्याची? हा प्रश्न कुळकायद्यामुळे सगळीकडे चर्चिला जात होता. या चित्रपटात भालजींनी याच विषयाला हात घालून ‘केवळ आर्थिक नफा मिळविणे हेच धोरण न ठेवता, जो कसलेल्या जमिनीचा उपयोग सार्या गावाला अन्न पुरविण्यासाठी करतो तोच खरा हाडाचा शेतकरी होय’ असा संदेश दिला. या चित्रपटामध्ये सात गाणी होती. ‘हेचि वेळ देवा नका मागे घेऊ! तुम्हाविण जाऊ शरण कोणा’ हा संत तुकारामांचा अभंग व ‘माझे मंदिरी चाल चाल चाल’ ही परशुरामाची रचना. बाकीची गाणी सूर्यकांत खांडेकर व माधव पातकर यांनी लिहिली होती. कविवर्य ग.दि.माडगुळकरांनी यात नायक हरबाची भूमिका केली. पण त्यांचे एकही गीत या चित्रपटात नव्हते.
मराठी जानपदाची परंपरा सांभाळणारे संगीत ह्या चित्रपटाला वसंतरावांनी दिले. ‘हेचि वेळ देवा’ हा अभंग व ‘माझी रानफुले सुकली’ हे भावगीतवजा गीत व ‘झांज ढोलकं साथ तुनतुनं डफ वाजतो कडाकडा ’ हे सवाल जबाबाचे गाणे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिले.
दिग्दर्शक माधव शिंदे व लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेचा ‘कांचनगंगा’ हा चित्रपट १९५४ साली प्रदर्शित झाला. याला भालजींची कथा व संवाद, पी. सावळाराम यांची गाणी होती. ‘कांचनगंगा’ची वैशिष्ठ्ये म्हणजे गोपीकृष्ण या सुप्रसिद्ध नर्तकाचे नृत्यदिग्दर्शन या चित्राला लाभले होते. या चित्रपटात सात गाणी होती. या सार्याच गीतांना वसंतरावांनी अतिशय गोड चाली लावल्या होत्या. ‘श्याम सुंदर रुप नयन राखीव’ या गाण्यातली शास्त्रीय सरगमची आलाप ऐकायला सुरेल वाटायची. ‘बोल वीणे बोल मंजुळ मंजुळ बोल’ हेही गाणे शास्त्रीय रागदारीवर आधारलेले होते.
‘मी तुझी का? का तुझी रे’, ‘गोरखकल्याण’ हे गाणे एक अंतरा गणिकेच्या तोंडी जलद तर दुसरे नायिकेच्या तोंडी हळू देऊन, वसंतरावांनी कथेच्या दृष्टीने संगीतातही औचित्य साधले आहे.
१९५५ साली भालजी पेंढारकरांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ नावाचा विनोदी चित्रपट काढला. विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर निपुत्रिक संस्थानिक वारस निवडण्याच्या प्रयत्नात असताना अनेक गंमतीदार गफलती घडतात. त्या विनोदी घटनांची व संस्थानातील उचापती मंडळींची कट-कारस्थाने असा सगळा सांगीतिक सावळा गोंधळ म्हणजे,‘येरे माझ्या मागल्या’. यातील सारी म्हणजे पाचही गाणी लता मंगेशकरांनी गायली होती तर ‘जोगिया मेरे घर आये’ हे गाणे उस्ताद अमीर खॉं साहेबांनी गायले होते.
१९५५ ते १९६० पर्यंत वसंतराव हिंदी चित्रपटांचे संगीत करण्यात इतके व्यस्त होते, की या काळात कुणीही मराठी निर्माता त्यांना संगीतासाठी चित्रपट देऊ शकला नाही. या काळातच ‘राजकमल’चे चार मोठे हिंदी चित्रपट जास्त मेहनत घेऊन त्यांना करावे लागले. १९६० साली मात्र वसंतरावांचे जुने मित्र, हिंदी-मराठी चित्रपटातील बुजुर्ग कलाकार गजानन जहागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माण करून वसंतरावांकडे त्यांचे संगीत सुपूूर्द केले. गंमत म्हणजे याच जहागीरदारांनी १९३८ साली ‘उमाजी नाईक’ याच नावाचा चित्रपट काढला होता. जुन्या ‘उमाजी नाईक’ची कथा, संवाद व गाणीही विष्णुपंत औधकरांनी लिहिली होती. तर नव्या ‘उमाजी नाईक’ची पटकथा-संवाद विश्राम बेडेकरांनी लिहिली होती व गाणी ग.दि.माडगूळकरांनी! माडगूळकरांची गाणी सरत्या पेशवाईच्या काळाची आठवण करून देणारी अशी होती व वसंतरावांचे संगीतही त्याच काळाला अनुरूप असेच होते. जुन्या ‘उमाजी नाईक’मध्ये केशवराव दाते होते तर नव्या ‘उमाजी नाईक’त नानासाहेब फाटक होते. मात्र उमाजी नाईकाचे काम जहागीरदारांनीच केले होते.
१९६२चा ‘बाप माझा ब्रह्मचारी’ म्हणजे शास्त्रोक्त संगीताचा अतिरेक करणार्यांवरची एक विडंबन कथा होती. खरं म्हणजे वसंतरावांनी हा चित्रपट कसा स्वीकारला? (त्यात शास्त्रीय संगीताचेही विडंबन होते) असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण वसंतरावांनी मनाला अतिशय आल्हाद देणारे असे संगीत दिले आहे. रागदारी संगीताची आवड असणार्यांना ते पूर्ण समाधान देते. चालीत विविधता आहे. वसंतरावांनी परिश्रम घेऊन संगीत दिल्याचे जाणवते. यात जुने गायक, नट जोग यांना राम मराठ्यांचा आवाज दिला होता.
‘बाप माझा ब्रह्मचारी’ हा शीर्षक गीताचा अभंग, त्याचे ध्वनिमुद्रण हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर झाले. कारण वसंतराव कमालीचे धार्मिक होते. या अभंगासाठी त्यांनी नामवंत गायक मंडळी आणली होती. भजन सम्राट फुलाजीबुवा, वासुदेवराव (स्नेहल) भाटकर, एकनाथ हातोसकर, संगीतरत्न केसरीनाथ भाये, मृदुंगमणी साटमबुवा या सार्यांनी तो अभंग म्हटला होता. वसंतरावांनी आणखी एक गंमत केली. ती म्हणजो तो अभंग या सार्या नामवंत मंडळींवरच चित्रीत करायला दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांना सांगितले. बापडे फुलाजीबुवा, भाटकर, हातोसकर ही मंडळी केवळ वसंतरावांसाठी तोंडाला रंग लावून भजन करायला बसली. ताडदेवच्या सेंट्रल स्टुडिओत (आताचे एअरकंडिशन मार्केट) हनुमान मंदिराचा छानपैकी सेट लावला होता. याच चित्रपटासाठी महेंद्रकपूर पहिल्यांदा वसंतरावांकडे गायले. याच सुमारास भालजींनी ‘मोहित्यांची मंजुळा’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली व त्याचे संगीत वसंतरावांना द्यायचे ठरवले. तशी बोलणीही झाली. पण पुढे ते संगीत लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या नावाने दिले.
वसंतरावांचे पुतणे सदानंद देसाई हे प्रसिद्ध संकलक व डबिंग तंत्रज्ञ होते. त्यांच्या मनात या सुमारास एखादा चित्रपट काढायचे चालले होते. त्यांनी ग. दि. माडळगूळकरांकडून भूषण कवींवर पटकथा व संवाद लिहून घेतले. ‘शिवराज भूषण’ या नावाने हा चित्रपट हिंदी व मराठी दोन्ही भाषेत काढायचे ठरले. पण महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही वसंतरावच करणार होते. पण दुर्दैवाने हे व्हायचे नव्हते! कारण या सुमारास संपूर्ण भारत देशातली परिस्थितीच इतकी बदलून गेली, की आता एखादा युद्धपट काढणे सदानंद देसाईंना फार गरजेचे वाटू लागू लागले. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. परकीय आक्रमणाच्या या संकटामुळे सारा भारतदेश ढवळून निघाला. अवघ्या भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत झाली. चित्रपटातली मंडळी यात मागे कशाला राहतील?
सदानंद देसाईंनी मग ग. दि. माडगूळकरांकडूनच पुन्हा एक चांगली कथा लिहून घेतली व त्यावर ‘छोटा जवान’ या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. ‘छोटा जवान’ची कथा साधारण अशी होती. शिवकालीन शूर मराठा घराण्यातील वीरश्रीयुक्त परंपरेची ही कथा. या घराण्यातील प्रत्येक पिढीतील एक तरी मर्द तळहाती शिर घेऊन मातृभूमीसाठी धावून गेला आहे. तीच परंपरा चालू ठेवण्यासाठी सध्याचा त्यांचा तरुण वंशज बाजीराव हा भारतीय सैन्यात आहे. बाजीराव रजेवर घरी येतो. त्यामुळे घरी आनंद असतो. पण अचानक चीनने देशावर आक्रमण केल्याची बातमी येते व बाजीरावला कामावर हजर होण्याची तार येते. मायभूमीच्या हाकेला ओ देण्यासाठी तो आपल्या वडिलांचा, बायकोचा, मुलाचा निरोप घेऊन ताबडतोब घर सोडतो.
————
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया