‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील
‘दशक्रिया’ या चित्रपटाच्या विषयाची ठिगणी माझ्या मनावर २०१३ मध्ये पडली. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप पाटील आणि कार्यकारी निर्माते राम कोंडिलकर माझ्याकडे आले होते. माझ्या मते चित्रपटाचे व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट अशी विभागणी होऊ शकत नाही. चांगला आणि वाईट सिनेमा असे दोनच ठळक प्रकार मला तरी जाणवतात. आम्हाला एक चांगला सिनेमा करायचा होता. परंतु, त्यात अदृश्य रेषा अशी असते की बव्हंशी चित्रपटनिर्मिती, सादरीकरण किंवा प्रस्तुतीकरणचा विचार केलास सध्या वर्षाला १५० मराठी चित्रपट रसिकांसमोर येत आहेत. यापैकी बहुसंख्य चित्रपटांचा कल हा व्यावसायिकतेकडे अधिक असतो. अशावेळी ‘दशक्रिया’सारखा ऑफबीट विषय निर्मिला जाणे हे खूप मोठं धाडस आहे. सामाजिक भान असलेला आलेख या चित्रपटामधून मांडण्यात आला आहे. अशा चित्रपटांच्या पाठीशी उभे राहणारे लोक खूप थोडे असतात. ‘रंगनील क्रिएशन्स’च्या माध्यमातून कोठारी कुटुंब या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून आम्ही हा चित्रपट करण्याचं धाडस करू शकलो. सगळी सोंगं करता येतात पण पैशांचं सोंग नाही करता येत. त्यामुळे
या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मिळालेल्या यशात निर्मात्यांचा खूप मोठा वाटा आहे, हे मी नमूद करू इच्छितो. माझा यापूर्वीचा ‘जोगवा’ चित्रपटसुद्धा तब्बल १२ वर्षांची तपश्चर्या होती. या चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ घेऊन मी हिंदी तसेच अनेक मराठी निर्मात्यांकडे गेलो होतो. खरं तर या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान करणार होता. परंतु, सहा महिने उलटले तरी त्यांच्याकडून काहीच हालचाल दिसली नाही. तेव्हा मी शाहरूख खान यांच्या सेक्रेटरली फोन करून ‘जोगवा’ तुम्हाला करायचा आहे की नाही याबद्दल विचारणा केली. यावेळी माझ्यासमोर हे बसले होते. त्यांनी मला चित्रपटाचं आधी शीर्षक विचारलं. त्यानंतर विषयाबद्दल चौकशी केली. तेव्हा मी त्यांना ‘जोगवा’ची कथा दोन-चार ओळींमध्ये सांगितली. दीड-दोन मिनिटांमधलं माझं हे कथानक ऐकून त्यांनी मला खिशातून शंभराच्या पाच नोटा काढून दिल्या. ‘संजय ये तेरा अॅडव्हान्स. किसीके दरवाजेपे जाने की जरूरत नहीं । यह फिल्म मैं प्रोड्युस कर कर रहा हूं’. त्या देवदूताचं नाव आहे श्रीपाल मोराकिया. तात्पर्य हे आहे की, चांगला कलाकृतींमागे उभं राहणारी भली माणसं लागतात. त्याशिवाय मराठी सिनेमा पुढं जाणार नाही.
‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ आणि आता ‘दशक्रिया’ एक वेगळं ध्येय, वेड मेंदूत घेऊन आम्ही दिवसरात्र फिरणारे फकीर लोक आहोत. आयुष्यभर आम्ही फकीरच राहू. यापुढेही अशाप्रकारच्या चांगल्या कलाकृती करीत राहू, असा आशावादही मी व्यक्त करतो.
– संजय कृष्णाजी पाटील
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया