सांगत्ये ऐका…
दिवंगत अभिनेत्री हंसा वाडकर यांचा आज स्मृतिदिन. वाडकर यांनी लिहिलेले ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र खूप गाजले. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपल्या बालपणातील सुखद आठवणींपासून ते नंतरच्या काळातील संघर्षापर्यंतची सर्व कहाणी मनमोकळेपणानं मांडली. त्यामुळेच वाचकांनी या आत्मचरित्राला उचलून धरलं. या आत्मचरित्रामधील वाडकर यांच्या बालपणाचा काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. त्यामध्ये हंसा वाडकर यांनी आपल्या ‘हंसा वाडकर’ या नामकरणाबद्दलही लिहिलं आहे.
——
आमचं घरं कलावंतिणीचं. माझी पणजी बायाबाई साळगावकर कलावंतीण होती. तिला आम्ही जीजी म्हणायचो. ती मुंबईचीच. आमचे आजोबा रघुनाथ यांच्यासह बायाबाई ग्रॅन्ट रोडवरील रघुनाथ मॅन्शनमध्ये राहत असत. कलावंतिणीच्या घराण्यातील स्त्रीनं किंवा पुरुषानं लग्न करणं, हे त्या वेळच्या परंपरेच्या विरुद्ध होतं. पण आजोबांनी लग्न केलं आणि ही परंपरा मोडली. त्या वेळी त्यांच्या लग्नाचं हे प्रकरण खूपच गाजलं.
पुढे पुढे आमच्या आजोबांना फेफरं येत असे. ते काहीच काम करीत नसत. नेहमी घरी पडलेले असत.
आमचे वडील भालचंद्र यांना तीन बहिणी. केशरबाई म्हणजे माई, इंदिराबाई म्हणजे बायजी आणि सुशिलाबाई म्हणजे ताई. वडिलांनी एका भाविणीच्या मुलीशी लग्न केलं. आमच्या आईचं नाव सरस्वती. आमच्या तीन आत्यांपैकी फक्त सुशिलाबाईंनीच लग्न केलं मास्टर विनायकरावांशी.
आमच्या वडलांना एकूण चार मुलं झाली. त्या पैकी सर्वात थोरली बहीण आणि धाकटा भाऊ गेले. आम्ही दोघे मधली भावंडं, थोरला भाऊ मोहन आणि मी, वाचलो.
जीजीनं- बायाबाईनं खूप कमावलं होतं ; पण आमचं कुटुंबही मोठं होत. भांडणं होऊ नयेत म्हणून जीजीनं आपल्या इस्टेटीची वाटणी केली. आमच्या वाट्याला सावंतवाडीचे घर आलं. हे घर कुणी बांधलं होतं, कुणास ठाऊक. पण होतं मात्र जिजीचंच. आम्ही म्हणजे मी, भाऊ, आई आणि वडील असे चौघेजण सावंतवाडीला राहायला आलो तेव्हा मी सहा वर्षांची होते.
माझा जन्म मात्र मुंबईचाच. २४ जानेवारी १९३२ रोजी मी मुंबईतच भालेरावांच्या हॉस्पिटलमध्ये जन्मले. माझा जन्म पायाळू. आईला बाळंतपणात अतिशय त्रास झाला. मूल वाचवावे की आई, असा प्रश्न पडला होता. वडलांनी अर्थातच आईला वाचवावे म्हणून सांगितलं. शेवटी कशीबशी मीही वाचले.
मला वाढवलं मात्र, आईच्या आईनं. कारण माझ्या जन्मानंतर लगेच भावाला देवी झाल्या होत्या आणि त्या वेळच्या प्रथेनुसार त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवलं होतं. त्याच्या खोलीत जाताना हातपाय स्वच्छ धुऊन, कपडे बदलून जावं लागे. बाळंतपणातून उठल्यावर आई त्याच्याजवळच बसून राही. त्यामुळं तिला मला घेता येत नसे. मला दूधदेखील आईच नव्हतं.
माझं मराठी चौथीपर्यंतचं शिक्षण सावंतवाडीतच झालं. तिथला परिसर निसर्गरम्य. तांबडी माती आणि हिरवे माड यांच्या सान्निध्यात तो काळ कसा सुखाचा गेला. अजूनही सावंतवाडीतील त्या दिवसांच्या गोड आठवणींनी मन हरखून जातं.
भाऊ आईचा लाडका आणि मी वडलांची लाडकी होते. पुढे आमच्या दोघांची भांडणं होत. त्यात आई भावाचीच बाजू घेई. म्हणून मी म्हणे, “आमच्या आईचं भावावर साखरेचं प्रेम आहे आणि माझ्यावर गुळाचं.” आमच्या दोघांच्या भांडणात आई मग धावू लागली की आम्ही पळत असू. मी लठ्ठ असल्यानं व धावता न आल्यानं मीच आईच्या हाती सापडे आणि मार खाई. आईनं मारलं की, मी वडिलांजवळ धावत असे.
सावंतवाडीला आमच्या घरासमोरच बंदरकरांचं एक मोठं श्रीमंत कुटुंब राहत होत. ते आमच्यापेक्षा खालच्या जातीचे होते. पण त्यांचा आमचा विशेष घरोबा होता. येणं जाणं होतं. बंदरकरांची मुलं आमच्याकडे येत आणि आम्ही त्यांच्याकडे जात असू. बंदरकरांचा एक मुलगा जगन्नाथ हा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. तोही आमच्या घरी येत असे. मुंबईला जाणं हे त्यांचं स्वप्न होत ; पण त्यानं मुंबई अजून पहिली मात्र नव्हती.
आम्हाला गाणं शिकवायला वडलांनी भगवंतबुवा म्हणून उस्तादजी ठेवले होते. मला आपला गाण्याचा कंटाळा, कशीबशी मी मेहनत करी. तरी थोडंफार मी गाण शिकले. मग जगन्नाथ बंदरकर मला गायचा आग्रह करीत. मी टाळायची.
एकदा त्यांनी आईला सांगितलं, “वहिनी, सांगा ना हो बेबीला गाण म्हणायला.” माझं खरं नाव रतन. पण सारे मला बेबीच म्हणत.
“मला नाही येत गाणं !” मी तोऱ्यात म्हटलं. आई म्हणाली, “मी सांगते म्हणून गाणं म्हण.” मी गप्पच बसून राहिले. गाणं म्हटलंच नाही. शेवटी आईनं चिडून धुणं धुवायच्या काठीनं मला बडवायला सुरुवात केली. शेवटी बंदरकर मध्ये पडले म्हणून थांबली. मार खाल्ला पण मी काही गायले नाही.
रात्री वडील नाटकातून आले तोवर मी माझा राग साचवून ठेवला होता. वडील आल्यावर मी सूर काढला. इतका वेळ आई “गाणं म्हण, गाण म्हण ” म्हणून मला सांगत होती. पण माझा सूरच लागत नव्हता. वडील आल्याबरोबर मी चांगलाच सूर धरला. आईनं मला मारल्याचं समजताच त्यांनी आईला मारलं. माझं समाधान झालं. पण नंतर मात्र वडिलांजवळ झोप येईना. उठले आणि आईच्या कुशीत निजले. तेव्हाच झोप आली.
जेवायला बोलावण्यासाठी वगैरे कामांसाठी आई मला बंदरकरांकडे नेहमी पाठवी. मी लहान होते. गेले म्हणजे जगन्नाथ बंदरकर माझे खूप लाड करीत. कधी कधी मला ते एकटीलाच गाठीत आणि लहान मुलीसारखं मला धरून ते विचारीत, “सांग, माझ्याशी लगान करशील ?”
मला काहीच कळत नव्हतं. लग्न वगैरे काय असतं हे मला त्यावेळी काहीच ठाऊक नसायचं. त्यांनी असं विचारलं म्हणजे मी नुसतीच हसे. काहीच बोलत नसे. नेहमी हे असच चालायचं. पुन्हा पुन्हा ते मला विचारीत, “सांग, माझ्याशी लग्न करशील ?”
मला तेव्हा प्रेम वगैरे काहीच कळत नव्हतं. मी म्हटलं. ही कसली कटकट लागली आहे आपल्यामागं ? म्हणून या कटकटीतून एकदाची सुटका करून घेण्यासाठी सांगून टाकलं, “करीन लग्न झालं ना ?”
“नुसतं हो नको सांगूस, शपथ घेऊन तस सांग.” बंदरकर म्हणाले. नको ही सारखी भुणभुण म्हणून मी म्हणाले, “शप्पथ, तुमच्याशी लग्न करीन. आता झालं ?”
बंदरकरांशी मी बोलले तर माझ्या भावांना, मावस भावांना ते आवडत नसे. पण आईच सांगे, “जा, त्यांना जेवायला बोलाव.”
म्हणून मी जाई. मला काहीच समजत नव्हतं. मग भाऊ बोलणं टाकीत.
सावंतवाडीलाच आमचं मावस घर होतं. इतर अनेक नात्या गोत्यातली माणसं होती. आम्हाला गंजीफा खेळण्याचा फार शौक होता. मी मातीच्या चुलीदेखील हौसेनं तयार करायची. गावात मामा नावाचे आमच्या नातेवाईकांपैकी एकजण होते. त्यांना आम्ही नुसतंच मामा म्हणत असू. ते कोंबड्यांसाठी फार सुंदर खुराडी तयार करायचे. त्यामध्ये आम्ही कोंबड्या पाळीत असू. मी कोंबड्यांच्या मागं मागं असे.
पण आमच्या बायजा आत्याकडे उस्ताद विलायतखॉंसारखे संगीतकार पाहुणे आले, की या कोंबड्यांवर धाड येई. आणि मी खूप रडे. पण आई सांगे, “घरची कोंबडी नका मारू बाई? बेबी रडते.” कटिंदर नावाचा एक प्राणी असतो. कोंबड्यांचा तो वैरी. एखाद्या कटिंदरानं रात्रीच कोंबडी पळवून नेली तरी मी रडून रडून धिंगाणा घाली. त्यामुळं माझं कोंबड्या पालन, हा एक घरात तापच झाला होता.
दुपारी आम्ही मुलं मुलं शेजारच्या टेकाडांवर आणि झाडांवर खेळत असू. एकदा मी आणि भाऊ शेजारच्या पारिजातकाच्या झाडावर खेळत असताना मी उंचावरून धपकन खाली पडले. इतका सपाटून मुका मार बसला होता, की काही वेळ मला बोलताच येईना. भाऊ म्हणाला, “घरी आईला सांगू नकोस पडलीस म्हणून.” “सांगेन जा ” मी म्हणाले. तो अजीजी करू लागला. “हवं तर तुला खाऊला पैसे देतो पण घरी सांगू नकोस.” मी घरी सांगितलं नाहीच. आठवणीतली ही पहिली कमाई. दुःख सोसलं पण पैसे मिळाले. हे इथपासूनच जणू ठरलं.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया