चित्र-चरित्र

बालगंधर्व
बालगंधर्व
गायक, अभिनेते
२६ जून १८८८ --- १५ जुलै १९६७

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. बालगंधर्वांनी आपल्या भूमिका साकारतानाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा’वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे’ हे शब्द सार्थच ठरतात! संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ.स. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली.
बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...

जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे’ हे शब्द सार्थच ठरतात!
‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसऱ्या कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बऱ्याच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, धार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तऱ्हा नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिसर्याम अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. १९८८ साली भारत सरकारने बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मृतीनिमित्त छापले होते. १९३५ मध्ये ‘प्रभात’ने निर्मिलेल्या आणि व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धर्मात्मा’ चित्रपटामध्ये बालगंधर्वांनी प्रमुख भूमिका साकारली होती. संत एकनाथाच्या भूमिकेत बालगंधर्व प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकले. बालगंधर्व-प्रभात-शांतारामबापू हे सारे मराठी रसिक मनास भुरळ पाडणारे होते. या बोलपटाचे नांव ‘‘महात्मा’’ ठेवण्यांत आले होते. पण ब्रिटीश सरकारला ‘महात्मा’ या नावाचे वावडे होते. संत एकनाथांचा हरिजनोद्धार ह्या ऐतिहासिक घटनेवर भर देणा-या कथेला राजकीय व सामाजिक महत्व होते. बोलपटांतील कांही प्रसंग व ‘महात्मा’ ह्या नावालाच मुंबईच्या सेन्सॉरने आक्षेप घेतला व ते प्रसंग व बोलपटाचे ‘‘महात्मा’’ हे नाव ‘‘धर्मात्मा’’ असे बदलल्यावरच तो प्रकाशित करण्यास परवानगी देण्यांत आली.
हा बोलपट मराठी बरोबरच हिन्दीतही काढण्यात आला होता. त्यानंतर बालगंधर्व नाटक मंडळीच्या सहयोगाने नटसम्राट बालगंधर्व यांनी सादर केलेली स्टेज टॉकी म्हणजे ‘साध्वी मीराबाई’ चित्रपट. बालगंधर्व यांनी स्त्रीवेशात सादर केलेला एकमेव चित्रपट, बालगंधर्व-रुईकर प्रॉडक्शनतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. बालगंधर्व यांनी अभिनीत केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे १९५१ मधील ‘विठ्ठल-रखुमाई’. यात त्यांनी तुकारामाची भूमिका साकार केली होती. बालगंधर्वांनी चित्रपट माध्यमात फारसे काम केले नाही. मात्र त्यांच्या आयुष्यावर २०११ मध्ये नितीन देसाई यांनी ‘बालगंधर्व’ हा चित्रपट निर्मिला.
-मंदार जोशी



चित्र-चरित्र