चित्र-चरित्र

नितीन चंद्रकांत देसाई
नितीन चंद्रकांत देसाई
कलादिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक
६ ऑगस्ट १९६५ --- २ ऑगस्ट २०२३

कलादिग्दर्शक म्हणून फारच थोड्या अवधीत चित्रपटसृष्टीत आपले स्वत:चे खास स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. ठाण्यात जन्मलेल्या नितीन यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. दापोलीजवळ पाचवली गावातील निसर्ग त्यांच्यातील कलाकाराला घडवण्यास कारणीभूत ठरला. शालेय शिक्षण झाल्यानंतर नितीन यांनी जे.जे. व रहेजा या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘तमस’, ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’ यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘परिंदा’, ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांसाठीही त्यांनी नितीशदांना साहाय्य केले.

‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून नितीन देसाई स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले. या चित्रपटातील भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आणि नितीन देसाई या नावाची जादू सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लॉंग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलिवूडपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला. अगदी अलीकडच्या ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘इंदू सरकार’ या चित्रपटांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं.

कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर देसाई यांनी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘अजिंठा’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले.

नितीन देसाई यांनी ‘चंद्रकांत प्रॉडक्शन कंपनी लि.’ची स्थापना केली असून त्या अंतर्गत ‘मॉं आशापुरा मतवाली’ या चित्रपटाची निर्मितीही केलेली आहे. कर्जत येथे त्यांनी चित्रीकरणासाठी अत्याधुनिक स्टुडिओ उभारलेला आहे.

कोणत्याही चित्रपटाचे कलादिग्दर्शन करताना नितीन देसाई यांनी अभ्यासपूर्ण रितीने ते केलेले दिसते. आलेल्या चित्रपटातील दृश्याचा विचार करतानाच त्यातील पात्रांचा, प्रसंगांचा-घटनांचा विचारही ते तारतम्याने करतात आणि मगच कलादिग्दर्शनाकडे वळतात. अभ्यासपूर्ण कलादिग्दर्शनामुळेच त्यांनी तयार केलेले सेट्स आखीव-रेखीव व प्रेक्षणीय होतात. त्यातली लय प्रेक्षकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शित केलेले चित्रपट पाहण्यासाठी, त्यातील भव्यता अनुभवण्यासाठी ते चित्रपट प्रेक्षक प्रेक्षागृहातच पाहतात, हाच त्यांच्या कामाचा यथोचित सन्मान आहे, असे म्हटले पाहिजे.

'फर्जंद', 'इंदू सरकार', 'पानिपत' हे त्यांचे अलीकडचे काही हिंदी-मराठी उल्लेखनीय चित्रपट आहेत.

नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र