चित्र-चरित्र

प्रभाकर पणशीकर
प्रभाकर पणशीकर
अभिनेते, नाट्यनिर्माते
१४ मार्च १९३१ --- १३ जानेवारी २०११

मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते अशी प्रभाकर पणशीकर यांची ओळख आहे. प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकात औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नाट्यसंपदा’ ह्या नाट्यसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले. प्रभाकर पणशीकरांनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ६ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली.

पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते. लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च १९५५ ह्या दिवशी ‘राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली. १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतांनाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ‘तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली. पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ‘नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ‘अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. ती फारशी यशस्वी ठरली नाहीत. मात्र त्यानंतरच्या ‘मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मितीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स. १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले. ‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अश्रुंची झाली फुले’, ’कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला.

‘अश्रूची झाली फुले’, ‘इथे ओशळला मृत्यू’, ‘जेव्हा गवताला भाले फुटतात’, ‘तो मी नव्हेच’, ‘थँक यू मिस्टर ग्लाड’, ‘भटाला दिली ओसरी’, ‘विचित्रलीला’ या नाटकांमध्ये पणशीकरांनी अभिनय केला. ‘अंधार माझा सोबती’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘संगीत कट्यार काळजात घुसली’, ‘किमयागार’ आदी नाटकांची निर्मिती केली. ‘नंदादीप’, ‘चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे’, ‘आई कुणा म्हणू मी’, ‘इये मराठीचिये नगरी’, ‘चांगभलं’ आदी मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र