चित्र-चरित्र

सावनी रवींद्र
सावनी रवींद्र
पार्श्वगायिका
२२ जुलै १९८९

सध्याची आघाडीची पार्श्वगायिका म्हणजे सावनी रवींद्र. शास्त्रीय गायक आणि गायक अभिनेता असलेले तिचे वडील डॉ. रविंद्र घांगुर्डे आणि मराठी संगीत नाटकातील गायिका अभिनेत्री डॉ.वंदना घांगुर्डे ह्या मात्यापित्यांकडून तिला बालपणापासून संगीताचे धडे मिळाले. वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने मराठी सुगम संगीताचे शिक्षण सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक पं. यशवंत देव यांच्याकडून घेण्यास सुरूवात केली. ‘नादब्रह्म’ परिवाराने आयोजित केलेल्या केलेल्या श्री यशवंत देव यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारप्रसंगी सादर केलेल्या 'देवगाणी' या कार्यक्रमात श्रीमती आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायन करण्याची संधी तिला मिळाली. या कार्यक्रमातील तिचे गायन ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी पाठविण्यात येणा-या महाराष्ट्राच्या संघात केली. १४ नोव्हेंबर २००२ रोजी सावनीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. याप्रसंगी यशवंत देवांनी रचलेल्य़ा गीताने आणि सावनीच्या स्वरांनी अवघे राष्ट्रपती भवन भारावून गेले होते! पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयातून सावनीने आपले शिक्षण घेतले. रवि दाते यांच्याकडे गजलचे तर तर पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. सावनी रविंद्रला वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षांपासून आज पर्यत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सांगीतिक सहवास लाभलाय आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तिला मार्गदर्शन मिळतंय. बी.ए संस्कृत आणि एम.ए मराठीपर्यंत तिनं शिक्षण घेतलेले आहे. भारती विश्वविद्यालयातून तिने एम.ए म्युझीक ही पदवी संपादित केलेली आहे. सावनी रविंद्रच्या कारकि‍र्दीची सुरुवातच त्यांच्या 'भावसरगम' या कार्यक्रमातून झाली. "होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेमध्ये सावनीने गायलेल्या "तू मला,मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो" या गीतामुळे तिचा आवाज घराघरात पोहोचला आहे. या गीताने रसिकांवर भुरळ घातली आहे. २०११ मध्ये संपन्न झालेल्या "आयडीया सा रे ग म पा" कार्यक्रमाच्या अंतिम फेरीतील ५ स्पर्धकांमध्ये सावनीचा समावेश होता. भाषेतसद्धा तिने गाणी गायली आहेत.

सावनी रविंद्रने तमिळ सिनेसृष्टीत वीसहून अधिक गाणी गायली आहेत व तिने तेलगु सिनेमामध्ये गाणे गायले आहे. सावनीची मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती अशा विविध भाषेतील गाणी प्रसिद्ध आहेत. `'गझल का सफर', 'ब्लॅक ऍन्ड व्हाईट', 'गुलझार - बात पश्मिने कि' यासारख्या अनेक कार्यक्रमातून तिने आपल्या स्वरांची जादू पसरवली आहे. ब्लॅक ऍन्ड व्हाईट या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी इथंही झाले आहेत.अजय अतुल यांच्या दुबई,अमेरिका याठिकाणी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तिने सहभाग घेतला होता.आतापर्यंत देशात तसेच परदेशात उदा.मस्कत,सिंगापूर,इस्त्राईल,कॅनडा,झिंम्बांबे या देशात तिचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. 'अजिंठा', 'अजब लग्नाची गजब गोष्ट', 'भैरू पैलवान कि जय','ती रात्र', 'मानसन्मान', 'दांडगी मुलं','पाच नार एक बेजार','नीळकंठ मास्तर','गुरूपौर्णिमा','कुणी घर देता का घर','प्राइम टाइम','पिंडदान','शॉर्टकट','कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटांसाठी तिनं पार्श्वगायन केलं आहे. संगीताचे कार्यक्रम, चित्रपट या बरोबरच तिचे 'आशाये' हा हिंदी, तर 'अजूनही' आणि 'कॅनव्हास' हे दोन मराठी अल्बम रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा, कोकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांची मनं जिंकल्यावर आता तीने बंगालीमध्ये आपलं पहिलं गाणे गायले आहे. ‘शोन रे शोखी’ हे तिचं पहिलं बंगाली गाणं रिलीज झालंय. फेब्रुवारी २०२० मध्ये सावनी रविंद्रने गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारीत ‘दीदी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती गायिका सावनी रविंद्रनेच केलेली आहे. गानसरस्वती लता मंगेशकर आणि मेलोडी क्विन आशा भोसले ह्यांच्या गाजलेल्या गीतांचा नजराणा घेऊन ह्या अगोदर ‘लताशा’ कार्यक्रमाची निर्मिती सावनीने केली होती.

‘लताशा’ हा कार्यक्रम सावनी रविंद्र गेली पाच हून अधिक वर्ष करत आहे. यात अमिट गोडीची मराठी गीते ह्यातून कानसेनांना ऐकायला मिळत असतात. पाच यशस्वी वर्षांनंतर लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम सावनी ही कन्सर्ट हिंदीमधून घेऊन आलीय. सावनी रविंद्रचे गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम् – एक निश्चय’ हे गाणे रिलीज झाले. ह्या गाण्याची निर्मिती सावनीच्या पतीने केली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये दिल्लीतील ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ वितरण सोहळ्यात सावनी रविंद्रला ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सावनी रवींद्र ही पुण्याच्या धांडे लॅबचे डॉ.आशिष धांडे यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे. सावनी रविंद्रचे पती डॉ. आशिष धांडे यांनी गेल्या वर्षी निर्माता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

-संजीव वेलणकर



चित्र-चरित्र