चित्र-चरित्र

ललिता फडके
ललिता फडके
पार्श्वगायिका
२५ मे २०१०

ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही ?’ असा प्रश्‍न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. मात्र त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गिरवले. शास्त्रीय संगीतही त्या उत्तम गायच्या. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’ चित्रपटामध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये होत्या. १९४०च्या दशकाच्या अखेरीस खर्‍या अर्थानं पार्श्‍वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या “साजन” मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच “नदिया के पार” मधल्या ‘मोरे राजा हो… ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं ! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’ साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नहीं सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार मा.सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी विवाहबध्द झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळ्यात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग ! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. ‘जशास तसे’, ‘मायबहिणी’, ‘उमज पडेल तर’, ‘वंशाचा दिवा’, ‘जन्माची गाठ’, ‘माझं घर माझी माणसं’, ‘रानपाखरं’, ‘चिमण्यांची शाळा’, ‘प्रतापगड’ इ. चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंनी पारखलं होते. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचं नाव सुचवलं होतं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’ मधली गीतरामायणातील कौसल्येची सर्व गाणी ललिताबाईंनी गायली आहेत. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची, म्हणूनच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो’, असं अभिमानानं सुधीर फडके सांगत.



चित्र-चरित्र