चित्र-चरित्र

अशोक पत्की
अशोक पत्की
संगीतकार
२५ ऑगस्ट १९४१

१९७२ मध्ये संगीतकार म्हणून उदयाला आलेल्या अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेले पहिले गीत ‘नाविका रे वारा वाहे रे’ खूप गाजले. संगीतात त्यांना सुरवातीपासूनच रुची असल्यामुळे शालेय शिक्षणाकडे त्यांनी फारसे लक्ष पुरवले नाही तसे संगीताचेही त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. लहानवयातच तबला आणि हार्मोनियम वाजवण्यात ते तरबेज झाले. मा.सुधीर फडके यांची त्यांना या क्षेत्रात साथ लाभली. अशोक पत्की यांची बहीण मीना स्वत: गाण्याचे कार्यक्रम करीत असत. त्याच्या सोबत त्यांनी संगीताच्या कार्यक्रमात पदार्पण केले. सुविख्यात संगीत दिग्दर्शक शंकर- जयकिशन, आर. डी. बर्मन यांचेही त्यांना या क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सुविख्यात गायक आणि नाट्यसंगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांच्याशी ओळख झाल्यावर, त्यांचा मदतनीस म्हणून नाटकांना संगीत द्यायला त्यांनी सुरवात केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी अशोक पत्की यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये अधिकृत संगीतकार म्हणून स्थान दिले. बालनाट्यासाठीही त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सुविख्यात गायिका सुमन कल्याणपूरकर यांच्याबरोबर त्यांनी भक्तिगीतांचा अल्बम केला. ‘एकदाच यावे सख्या’ या अल्बमसाठीही संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी असंख्य चित्रपटांना दिलेल्या संगीतासाठी काही चित्रपटांचा इथे उल्लेख करता येईल- ‘आम्ही असो लाडके’, ‘आलिशा’, ‘अंतर्नाद’, ‘आनंदाचे झाड’, ‘बिनधास्त’, ‘चिंगी’, ‘चिनू’, ‘दे टाळी’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’, ‘सरदारी बेगम’, ‘सत्त्वपरीक्षा’... अशा असंख्य चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ११५ मराठी चित्रपट, २५0 च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. ‘आभाळमाया’, ‘गोट्या’, ‘श्रीमान-श्रीमती’, ‘वादळवाट’ अशा टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांची जिंगल्स अतिशय लोकप्रिय झाली आहेत. ‘धारा धारा... शुद्ध धारा’, ‘झंडू बाम, झंडू बाम वेदनाहारी बाम’ ही आणि अशी काही त्यांची जिंगल्स चित्रपटांच्या गाण्यांसारखी आपल्या तोंडची झाली आहेत. राष्ट्रीय एकात्मतेवरचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या ल्युईस बँक्ससोबत केलेल्या, पीयूष पांडे यांची रचना असलेल्या गीताला इतकी प्रसिद्धी मिळाली की, याला अनधिकृत राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली! ‘संचारी गुरुकुल’ अशी एक स्वत:ची संगीतशाळा २०१३ मध्ये त्यांनी पुण्यात काढली आहे. ‘सप्त सूर माझे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

पत्की यांना, संगीतक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. नाटकांसाठी नाट्यदर्पण पुरस्कार, ‘प्रियतमा’ नाटकासाठी १९९६ मध्ये, चार दिवस प्रेमाचे या नाटकासाठी २००७ मध्ये त्यांना प्राप्त झाला. १९९९ मध्ये त्यांना ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकासाठी रंगदर्पण पुरस्कार मिळाला. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांसाठी अर्धांगी, आपली माणसं, सावली अशा काही चित्रपटांना महाराष्ट्र राज्याचा चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. नॅशनल फिल्मसाठी २००६ मध्ये अंतर्नाद, मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटर ऍवॉर्ड, ‘मी सिंधूताई सपकाळ’साठी सूरसिंगार पुरस्कार, ‘गोष्ट धमाल नाम्याची’साठी व्ही. शांताराम पुरस्कार अशा पुरस्कारांनी ते सन्मानित झालेत. त्यांनी संगीत दिलेली ‘आभाळमाया’ ही मालिका विशेष गाजली. अनन्य पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर स्मृतिपुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, शब्दरत्न गौरव पुरस्कार, वसुंधरा पंडित स्मृति पुरस्कार, राम कदम पुरस्कार, झी. टीव्ही पुरस्कार, सह्याद्रीचा नवरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांचे पत्की मानकरी ठरले आहेत.
- संजीव वेलणकर, पुणे



चित्र-चरित्र