चित्र-चरित्र

विवेक
विवेक
अभिनेता
२३ फेब्रुवारी १९१८ --- ९ जून १९८८

विवेक यांचे मूळ नाव गणेश भास्कर अभ्यंकर. त्यांना चित्रकला आणि क्रिकेट या दोन गोष्टींची विशेष आवड होती. देखणे, प्रसन्ना व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर ते ‘प्रभात फिल्म कंपनी’मध्ये चित्रकलेचे काम करण्यासाठी म्हणून गेले आणि तेथे त्यांची निवड चित्रपटातील कामासाठी झाली. तेथपासून अभिनय हीच त्यांची करियर ठरून गेली. १९४४ सालच्या भक्तीचा मळा या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५० साली बायको पाहिजे या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना विवेक असे नाव दिले. विवेक हेच नाव गणेश अभ्यंकरांनी पुढे कायम वापरले. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले दिग्दर्शक राम गबाले यांचा ‘देवबाप्पा’ व दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा ‘वहिनींच्या बांगड्या’ हे चित्रपट खूपच गाजले. त्यानंतर लगेच, १९५४ साली आलेल्या ‘पोस्टातील मुलगी’ या चित्रपटामुळे विवेक यांचे नाव मराठी मध्यमवर्गीय घराघरांत पोचले. विवेक यांचे ‘सुहासिनी’ व ‘देवघर’, ‘दिसतं तसं नसतं’, ‘माझं घर माझी माणसं’ ‘पतिव्रता व कलंकशोभा’, ‘नसती उठाठेव’, ‘थांब लक्ष्मी, कुंकू लावते’, अवघाची संसार, ‘ओवाळिते भाऊराया, ‘नाव मोठं लक्षण खोटं’ हे काही चित्रपट लोकप्रिय झाले. विवेक यांनी त्यांची चित्रपटातील कारकीर्द संपल्यावर नाटकात कामे करणे सुरू केले. त्यांची ‘लग्नाची बेडी’ मधील डॉ. कांचन वा ‘दिल्या घरी सुखी राहा’ मधील अविनाश ही नाटकातील कामे विशेष गाजली. विवेक यांच्या पत्नी लीला अभ्यंकर यांचे माहेरचे नाव लीला मुळे. त्या ठाण्याच्या. अभिनेते विवेक यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात २३ फेब्रुवारी २०१७ साली झाली. नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे.
‘अभिनेता विवेक’ या पुस्तकामधून त्यांचा व्यक्ती आणि कलाकार म्हणून लेखांमधून वेगवेगळा उत्तम परिचय करून दिला आहे. सांगाती प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे. सुलोचना, रमेश देव यांच्यासारख्या मान्यवरांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. बाळ कुडतरकर तर त्यांचे कॉलेजातील वर्गमित्र. अशा विविध आठवणींमधून विवेक यांचे जे चित्र उभे राहते ते एक सरळसाधे सात्त्विक व्यक्ती म्हणून. चित्रपटासारख्या ग्लॅमरस क्षेत्रात राहूनदेखील ते साधे गृहस्थी जीवन जगले. सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीसारखे वागले. त्यांचे देखणेपण सगळ्यांच्याच नजरेत भरे. किंबहुना, त्यासाठी त्यांची तुलना काही वेळा हिंदीतील प्रदीपकुमारशी केली जाई, की चेहरा देखणा पण अभिनयाच्या नावाने शून्य! परंतु या पुस्तकातील लेख वाचत असताना विवेक यांनी मराठी प्रेक्षकांवर कसे गारूड केले होते त्याचा प्रत्यय येतो. पुस्तकातील सगळ्यात हृद्य संदर्भ आहे तो कुसुमाग्रजांनी विवेक यांना दिलेल्या श्रेयाचा. कुसुमाग्रजांनी म्हटले आहे, की मी य.गो. जोशी यांच्या कथेवरील चित्रपट म्हणून ‘वहिनींच्या बांगड्या’ पाहिला. परंतु त्यामुळे मला चित्रपट पाहण्याचे व्यसनच लागले. त्यांनी त्या चित्रपटातील विवेक यांच्या कामाचे कौतुक केले आहे. विवेक यांचे ९ जून १९८८ निधन झाले. आपल्या समुहा तर्फे विवेक यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.* ९४२२३०१७३३



चित्र-चरित्र