अतिथी कट्टा

दिनांक : १३-०५-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌’रंपाट ’ म्हणजे पंचपक्वान्नाची थाळी…




नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास, टाइमपास २, न्यूड या आगळ्यावेगळ्या चित्रपटानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला रंपाट चित्रपट येत्या १७ मेला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाबद्दल त्यांचं हे मनोगत.

——
‘रंपाट’द्वारे मी आत्ता जी गोष्ट सांगितली आहे, तीच गोष्ट २००८ मध्ये माझ्याबाबत घडली होती. मी माझ्या ‘नटरंग’ या पहिल्या चित्रपटासाठी धडपड़ करीत होतो. त्यावेळी ‘झी स्टुडिओ’सारख्या प्रख्यात संस्थेनं माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला एक चांगला, मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्यामुळे ‘नटरंग’ बनला. तिथून ‘झी स्टुडिओज’चा आणि माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी या संस्थेबरोबर ’टाइमपास ’, ’टाइमपास २’, ’न्यूड ’ असे एकूण चार चित्रपट केले. ’रंपाट ’ हा माझा त्यांच्यासोबतचा पाचवा चित्रपट आहे. म्हणूनच मी या चित्रपटाला पंचपक्वान्नाची उपमा देतो. ते आजच्या प्रेक्षकाला एखाद्या स्वादिष्ट जेवणाचीच आठवण करून देईन, अशी मला आशा आहे. त्यामुळे झी स्टुडिओज आणि या स्टुडिओजच्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे.

’बालक पालक’ चित्रपटानंतर तरुण कलाकार मंडळी आपल्या चित्रपटांमध्ये हीरो आणि हीरोइन म्हणून यायला लागली. त्यानंतर ’टाइमपास ’ आणि ’टाइमपास २’, ’सैराट ’ झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुलांना एक नवं स्वप्न पाहायची संधी मिळाली. हे स्वप्न होतं सिनेमात काम करण्याचं. परंतु सिनेमात काम करण्यासाठी नक्की काय करावं लागतं, मुंबईला आल्यानंतर कोणाला भेटायचं, या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी कोणता मार्ग आहे असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रंपाट चित्रपट आहे. त्यामुळे ही कल्पना डोक्यात आल्यानंतर अंबर हडप आणि गणेश पंडित या माझ्या लेखकद्वयीला सोबत घेऊन चित्रपटाच्या लेखनावर काम सुरू केलं.

खरं तर या चित्रपटाच्या नायक-नायिकेचा प्रवेश म्हणजे स्ट्रगल असला तरी तो खूप गमतीशीर आहे. इथं येणारी मुलं खूप इनोसण्ट असतात. त्यामुळे त्या प्रसंगी या मुलांना जे काही सांगितलं जातं ते करायला ते नाही म्हणत नाहीत. ते बघून त्यांची परीक्षा घेणाऱ्यालाच कधी कधी हसायला येतं की अरे ही मुलं असं का करताहेत म्हणून. आकाशातल्या ताऱ्यांना स्पर्श करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गावच्या मुलांमध्ये हे स्वप्न खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. हे स्वप्न घेऊन ही मुलं मुंबईत दाखल होतात. या मुलांना लवकर, फटाफट म्हणजे रंपाट यश हवं असतं. आजच्या मोबाइल युगात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट खूप फास्ट हवीय. परंतु ते मिळवण्यासाठी काय मेहनत करावी लागते याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट आहे. मुलांच्या स्ट्रगलचा हा मजेदार आढावा आहे.

’झी स्टुडिओ’ने आजवर अनेकांना चित्रपट क्षेत्रात पदार्पणाची संधी दिली आहे आणि आता ते या चित्रपटाद्वारेच तरुण पिढीला मनोरंजन क्षेत्रामध्ये कसं यायचं याचा मार्ग दाखवत आहेत. हा चित्रपट म्हणजे एक धमाल जॉयराइड आहे. या मुलांच्या सुख-दुःखात आपण सहभागी होतो. त्यामुळे हा चित्रपट करताना खूप मजा आली. सिनेमा निर्मिती प्रक्रिया ही खूप गंभीर असली तरी आम्ही खूप हसतखेळत हा चित्रपट पूर्ण केला. या प्रक्रियेचा आम्ही आनंद घेतला आणि त्यामुळेच हा आनंद प्रेक्षकांपर्यंत पोचेल मला अशी अपेक्षा आहे.

मी कलाकारांच्या कधी ऑडिशन्स घेत नाही. एखादी गोष्ट डोळ्यांसमोर आली की मी पात्रं शोधण्याचा प्रयत्न करतो. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मी अभिनय बेर्डेला भेटलो तेव्हाच मला चित्रपटातला ’मिथुन ’ त्याच्यात सापडला. त्याच्या प्रत्येक हालचालीत, बोलण्यात, नृत्यात मला मिथुन दिसला. कश्मिराला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तिला पटकन एक १५ मिनिटांचा व्हिडिओ करून पाठवण्यास सांगितलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लगेचच जाणवलं की आपल्याला हवी असलेली ’मुन्नी ’ हिच्यात दडलेली आहे. अभिनय आणि कश्मिरा हे दोघेही मिथुन आणि मुन्नीच्या खूप जवळ जाणारे वाटल्यानं मी त्यांची निवड केली. सिनेमा पाहाल तेव्हा कश्मिराचा हा पहिला चित्रपट आहे असं कोणालाही वाटणार नाही. अभिनयनंही या चित्रपटामध्ये खूप अप्रतिम काम केलं आहे.

– रवी जाधव

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया