‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे !’ – रंजना
दिवंगत अभिनेत्री रंजना यांचा २३ जुलै हा जन्मदिन. या चतुरस्त्र अभिनेत्रीनं आपल्या वाट्याला आलेल्या दीड दशकांच्या कारकिर्दीमध्ये खूप वैविध्यपूर्ण काम केलं. स्वत:ला कोणत्याही भूमिकेच्या चौकटीत बांधून घेतलं नाही. त्यामुळेच त्यांच्या बहुतेक सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मात्र अपघातारूपी आलेल्या मोठ्या संकटानं त्यांच्या कारकिर्दीला धक्का बसला. अपघातानंतरच्या आजारपणात त्यांना खूप काही सोसावं लागलं. परंतु, या काळातही त्या मनानं खूप घट्ट होत्या. दिवंगत पत्रकार-लेखक वसंत भालेकर यांनी ‘चंदेरी आठवणी’ या पुस्तकात अपघातानंतर रंजना यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली होती. त्याद्वारे रंजना यांचा चित्रपट माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोण तसेच आजारपणात त्यांना कोणी मानसिक धैर्य दिले, याची माहिती मिळते. आपल्या भूमिकांच्या वेगळेपणाच्या अट्टाहासाबद्दल रंजना यांनी सविस्तर विवेचन केलं आहे. ते आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत.
——
“प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षे वनवास घडला होता. मला चौदा महिने ! संपला एकदाचा काळाकुट्ट काळ ! चौदा महिने घराबाहेर राहिले आहे ; पण हे घराबाहेर राहणे जीवघेणं. पण अरिष्ट टळलं. मी संकटमुक्त झाले ! ” माझ्या हाती तिळगुळ ठेवीत रंजना उद्गारली. तिचा गोरापान चेहरा अधिकच उजळला होता तेव्हा. डोळ्यात वेगळंच तेज, भविष्याचं स्वप्न तरळू लागलं होतं. तशी ती नेहमीच हसतमुख राहणारी पण यावेळच्या तिच्या हास्यात आगळाच गोडवा होता. कुंडकळ्यासारख्या पांढऱ्याशुभ्र दंतपंक्ती चमकत होत्या. खरं सांगू, माझ्यापुढं तेव्हा दलाल मुळगावकरांनी आपल्या सव्यसाची कुंचल्याने रंगविलेली गोड, आखीव, रेखीव, स्वरूपसुंदरी तरुणीच समूर्त झाली होती. रंजनाचं हे रुपडं भावणारं. मी वत्सलाताईंकडं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत होता नुसता !
महालक्ष्मी हाजीअलीच्या इस्पितळात गेले ७-८ महिने ती स्वतःवर इलाज करीत असलेली. त्यापूर्वी बॉम्बे इस्पितळामध्ये. शांतारामबापूंच्या ‘झंझार’ चित्रपटाच्या बाह्य चित्रणासाठी जात असताना बंगळूरजवळ तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आणि १९८४ च्या २२ नोव्हेंबरला हा वनवास सुरू झाला तो थेट १९८६ च्या जानेवारीपर्यंत. हे चौदा महिने तिनं इस्पितळात काढले. पहिले ६-७ महिने तर बिछान्यावर अक्षरशः उताणे झोपून. ना इकडं हलायचा का ना तिकडे. पुढं हालचाल सुरू झाली. जखमी स्नायूंना, हाडांना मजबुती आणण्यासाठी मग या हाजीअलीच्या इस्पितळात शारीरिक व्यायाम सुरू झाला.
रंजनाबरोबर तिची आई वत्सलाताईही. त्यांनाही या तापदायक, क्लेशकारक चौदा महिन्यांच्या, इस्पितळातील वास्तव्याच्या यातना भोगाव्या लागल्या. लाडकी लेक शारीरिक क्लेश सहन करीत असताना, मृत्यूशी निकराने झुंज देत असताना, ही माऊली मानसिक यातना भोगीत होती. रडण्यासाठी डोळ्यात आसवेच उरली नव्हती. तो गंगायमुनेचा पूर प्रारंभीच वाहून गेला होता. धाकटी बहीण विजूताई (संध्या) आपल्या भाचीची ही विकलांग अवस्था बघून वत्सलाताईंना मिठी मारून ओक्साबोक्सी रडे. तेव्हा जड अंतःकरणानं त्यांनाच या हळव्या, भावनाप्रधान बहिणीची समजूत काढावी लागे. पण अनेकदा दोघीही हुंदके देतच राहत आणि मग रंजनाला त्यांना गप्प करावं लागे.
एकूण अवस्थाच तशी होती. रंजनाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच ती या भीषण अपघातातून वाचली. तिची इच्छाशक्ती जबरदस्त, आत्मबल विलक्षण म्हणूनच तिनं साऱ्या शारीरिक व मानसिक यातना सहन करताना चेहऱ्यावरील हास्य लोपू दिलं नाही. अक्षरशः पुनर्जन्मच झाला तिचा !
फार कठीण होतं हे सारं. सत्वपरीक्षाच ती. शांतारामबापूंसारखा धीरोदात्त कणखर पुरुषही रंजनाची ही एकूण दयनीय अवस्था बघून डळमळला. आतून पार गलबलून गेला. डोळे पाण्याने डबडबले होते तेव्हा त्यांचे. एवढं भीषण स्वरूप होतं या अपघाताचं. तिच्या शरीराचं हाड न हाड खिळखिळं झालं होतं. अनेक जागी चेचून गेलं होतं. गळ्याच्या वरच्या भागाला कसलीच इजा झाली नव्हती. चेहरा आणि डोकंही अपघातातून वाचलं होतं. त्यामुळं स्मृती जागृत. स्मरणशक्ती ताजी, टवटवीत राहिली. पण शारीरिक हानी अतोनात झालेली. ती यातून वाचलंच याची खात्री तेव्हा प्रगत वैद्यकशास्त्रही देऊ शकत नव्हतं. शांतारामबापू म्हणूनच खूप धास्तावले होते. होणारं टळणार नव्हतं. पण त्यांना मात्र अपराध्यागत वाटत होतं. आपणच या अपघाताला कारण झालो आहोत असं त्यांच्या मनानं घेतलं होतं.
पण त्यांनी स्वतःला सावरलं. या दुखण्यातून रंजनाला बरी करायचीच या जिद्दीनं पुढची पावलं टाकली. केवळ हे वैद्यकीय उपचार करून शांतारामबापू थांबले नाहीत; तर त्यांनी रंजनाला धीर दिला.
“रंजू, तू निश्चित बरी होणार. एकदा तू हिंडायला, फिरायला लागलीस की तुझ्यासाठी झकास भूमिका लिहून घेतो. तुझ्या अभिनयकलेचे रुपेरी पडद्यावर नवरंग फुलवून टाकतो. सारे दिपून जातील तुझं काम बघून बेटा, तसं तू आजच साऱ्यांना नानाविध भूमिकांनी मंत्रमुग्ध केलं आहेस. तू अष्टपैलू अभिनेत्री आहेस हे सिद्ध करून दाखवील आहेस. ऐन तारुण्यात स्त्रीची वृद्धा रंगविणे, ते वृद्धेचं बेअरिंग सांभाळून लोकांना आपलं तरुणपण विसरायला लावणं सोपं नाही, म्हणून तर तुला जनमानसात फार मोठं मानाचं, मोलाचं स्थान लाभलं आहे.” शांतारामबापू तिला धीर देताना म्हणत.
शांतारामबापूंच्या या शब्दांनीच रंजनाच्या मनाची उभारी वाढली. तिचं भावबल वृद्धिंगत केलं. आपण कोणीतरी आहोत याची जाणीव करून दिली. रंजना म्हणूनच आपल्या शारीरिक यातना विसरली. प्रत्येक गोष्टीला कणखर मनानं ती सामोरी गेली. त्यामुळंच कठीणातील कठीण शस्त्रक्रियांनाही तिनं न घाबरता, न डगमगता तोंड दिलं. अशा वेळी वत्सलाबाईंच्या तोंडचं पाणी पळे. पण रंजनाच्या डोळ्यांत पाण्याचं टिपूसही दिसलं नाही.
“माझ्या अंगात किती सुया टोचल्या गेल्या, शरीरात किती तीक्ष्ण हत्यारं फिरली आणि पोटात किती तऱ्हेच्या, किती रंगाच्या गोळ्या गेल्या आहेत, कसलं कसलं औषध मी प्यायले आहे हे माझंच मला आठवत नाही. साऱ्या शरीराला आणि गळ्याला या शस्त्रक्रियेची, या गोळ्यांची, या औषधांची आता इतकी सवय झाली आहे की, या गोळ्या आणि औषधं हेच माझे नित्याचं अन्न बनलं आहे.” रंजना अगदी मोकळेपणानं हसत एका भेटीत मला म्हणाली होती.
“पण हे सारं सहन करण्याची प्रचंड मानसिक शक्ती तरी कुठून आणलीस ?” मी रंजनाला तेव्हा विचारलं होतं. रंजनाची तेव्हाची एकूण अवस्था बघून माझे डोळे भरून आले होते.
महाराष्ट्राच्या या गुणवंत अभिनेत्रीला कुणा पाप्याची दृष्ट लागलेली बघून मन विव्हळू लागलं होतं.
“आसवं ढाळून माझे दुःख, माझ्या यातना थोड्याच कमी होणार आहेत ! प्राप्त परिस्थितीला तोंड देणं भागच पडणार. मग मी का रडावं ?” रंजनानं उलट मलाच सवाल केला.
रंजनाच्या डबिंगवरून आठवलं. चांदवली स्टुडिओचे संचालक बाबा कदम यांच्या ‘हिचं काय चुकलं’ हे रंजनानं अपघातापूर्वीचं तिचं पूर्ण केलेलं चित्र. ते तिच्या डबिंगसाठी थांबलेले. रंजनानं हे डबिंग करण्याचं ठरविलं. मात्र ते ‘राजकमल कला मंदिरा’त व्हावे असा तिचा आग्रह. ज्या कलामंदिरात आपलं कलाजीवन सुरू झालं तेथेच आपल्या पुनर्जन्मानंतरचं पहिलं काम व्हावं अशी तिची श्रद्धा !
ती राजकमल मंदिरात पोहोचली. कुणाच्याही रेकॉर्डिंगला कधीही न येणाऱ्या संध्याताई त्या दिवशी अगोदरपासूनच हजर. किरण शांताराम यांची तारांबळ उडालेली. शांतारामबापू जातीनं आलेले. त्यांनी रंजनाचा खांदा प्रेमभराने थोपटला. पडद्यावर दृश्य सुरू झालं. पण रंजनाच्या तोंडून शब्द उमटेना. वर्षभराचा कालावधी मधे गेलेला. आपल्याला काही सुचत नाही, दिसत नाही अशी केविलवाणी अवस्था तिची झाली होती. शांतारामबापू रेकॉर्डिंगरूममध्ये गेले. स्वतः ध्वनिलेखन यंत्राजवळ बसले. रंजनाला आपले संवाद बोलण्याचा आदेश आला आणि काही क्षणातच चमत्कार घडला. रंजना आपले संवाद भराभरा बोलत गेली. सकाळपासून तिचं डबिंग चाललेलं. आपली आजही कार्यक्षमता कमी झालेली नाही येथपासून आपण एका अडलेल्या निर्मात्याला मार्गाला लावला येथपर्यंत समाधान रंजनाला मिळालं.
किरण शांताराम तर त्या दिवशी कमालीचे खुश झाले होते. आपली बहिण बरी झाली याचा आनंद त्यांना विशेष झाला होता.
“आता परदेशातून व्हीलचेअर आणायची गरज नाही. ” ते हर्षभरानं ओरडलेच. त्यांनी ती तेथून आणण्याची व्यवस्था केली होती.
या डबिंगनंतर मात्र रंजना झपाट्यानं बरी होत गेली. मध्ये काहीच घडलंच नाही असं तिला आज वाटतंय.
“ईश्वरानं माझा चेहरा वाचविला. माझी समरणशक्ती शाबूत ठेवली त्याअर्थी माझ्या हातून आजच्याहूनही अधिक कलेची सेवा व्हावी असंच त्याला वाटत असावं. म्हणूनच मी आता नव्या जोमानं काही तरी करून दाखविण्याच ठरवलंय. माझ्या हातून भव्य दिव्य घडावं असच मला वाटतंय.” रंजना मला उत्साहानं म्हणाली.
रंजनाला मी बालपणापासून पाहतोय. तिची आई मराठी, गुजराती रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेत्री वत्सलाबाई देशमुख. रंजना माझ्या डोळ्यांदेखतच लहानाची मोठी झाली. तिचं कला जीवन विकसित होत गेलं. ती येथे बालतारका म्हणून चमकली. पुढं ती मराठी रंगभूमीवर काही दिवस वावरली. मग ती चित्रपटसृष्टीतच स्थिरावली.
– वसंत भालेकर
सौजन्य : रोहन प्रकाशन
पुस्तकाचे नाव : चंदेरी बातचीत
लेखक : वसंत भालेकर
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया