‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आनंदकुमार ऊर्फ अँडी यांनी ‘गावठी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. श्रीकांत पाटील, योगिता चव्हाण, नागेश भोसले, वंदना वाकनीस, गौरव मोरे आदींच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेतच. आर. सिवाकुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला अश्विन भंडारे आणि श्रेयस आंगणे यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल त्यांच्याशी दिग्दर्शक आनंदकुमार यांच्याशी साधलेला हा संवाद.
——–
‘गावठी’ या चित्रपटामधून तुम्ही काय सांगायचा प्रयत्न केला आहे ?
– गावठी हा चित्रपट म्हणजे एका ‘कॉमन मॅन’चा प्रवास आहे. हा चित्रपट प्रेक्षकवर्ग जेव्हा चित्रपटगृहात पाहायला येईल, तेव्हा तो या चित्रपटामधील नायकाशी स्वतःला ‘रीलेट’ करील. आपण एखाद्या ‘स्टार’चा चित्रपट न पाहता आपलंच कथानक रुपेरी पडद्यावर पाहतोय, असं त्यांना वाटेल. ‘गावठी’ हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. शाळा-कॉलेज, बस, रेल्वे अशा ठिकाणी अनेकांना हा शब्द म्हणून हिणवलं गेलं आहे. परंतु, ‘गावठी’ म्हणून हिणवल्या गेलेल्यांनी आयुष्यात खूप काही करून दाखवलं आहे. म्हणूनच आम्ही या चित्रपटाची टॅगलाइन ‘अपमान नव्हे अभिमान’ अशी ठेवली आहे. माझ्या दृष्टीनं कोणत्याही व्यक्तीसाठी आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. ती जर तुमच्याजवळ असेल तर मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढविणार्या गोष्टी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
‘गावठी’मधील ‘लव्हस्टोरी’बद्दल काय सांगाल ?
– प्रेम ही अशी भावना आहे की, प्रत्येक टप्प्यावर ती आपल्यासोबत असते. लहानपणी आई-वडिल, भाऊ-बहिणीचं प्रेम आपल्याला मिळतं. ‘टीन एज’नंतरच्या वैवाहिक आयुष्यात आपल्याला जीवनसाथीची मदत मिळते. आपण आपली कारकीर्द घडवीत असताना आपले सहकारी, मित्र आपल्यासोबत असतात. त्यामुळेच आमच्या या चित्रपटामध्ये ‘प्रेम’ या संकल्पनेला खूप महत्त्व आहे आणि खूप प्रेमानंच मी हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटामधील नायक श्रीकांत पाटील आणि योगिता चव्हाण हे नवीन आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे.
दिग्दर्शन क्षेत्रात तुम्हाला पदार्पणाची संधी देणारे निर्माते आर. सिवाकुमार यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ?
– विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते आयुष्यामध्ये. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते सिवा सरांनी एक दिग्दर्शक म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. मला या चित्रपटासाठी जे काही हवं होतं ते त्यांनी मला दिलं आहे.
या चित्रपटाचे छायाचित्रण खूप चांगलं झालं आहे. त्याबद्दल काय सांगाल ?
– ‘डू नॉट डिस्टर्ब’ चित्रपटाच्या वेळी माझी पहिल्यांदा अजित रेड्डी यांच्याशी भेट झाली. तेव्हा आमचे सूर खूप छान जुळले होते. त्यामुळे आपण कधी चित्रपट दिग्दर्शित केला तर त्याचे सिनेमॅटोग्राफर श्री. अजित रेड्डीच असतील हे मी मनात ठरवलं होतं. त्याप्रमाणे ‘गावठी’चं प्लॅनिंग सुरू असताना मी रेड्डी यांना फोन केला आणि लगेचच त्यांनी हा चित्रपट करण्यास होकार दिला. खरं तर ते आपल्या कुटुंबियांसह हैदराबादला राहतात. मात्र माझा फोन आल्यानंतर ते खास मला भेटायला आले. गमतीची गोष्ट म्हणजे मी त्यांना माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून तुमची मदत मिळेल ना असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी एकच उत्तर दिलं, ‘टेन्शन मत ले.’ अशाप्रकारे माझ्यासाठी हे वाक्य म्हणणारी रेमोसरांनंतर ही दुसरी व्यक्ती भेटली होती. मला आयुष्यात यापेक्षा आणखी काय हवं होतं?
या चित्रपटाच्या संगीताला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली आहे. संगीतावर तुम्ही कसं काम केलंत ?
– या चित्रपटाला श्रेयस आंगणे आणि अश्विनी भंडारे यांनी संगीत दिलं आहे. पहिल्यांदा मी श्रेयसना भेटलो. त्यांना चित्रपटामधील गाण्यांचा प्रवास सांगितला. त्यानंतर त्यांनी लगेचच चित्रपटाच्या गाण्याला चाल लावून मला ऐकवली. ती मला एवढी आवडली की मी तेव्हाच सांगितलं की हे गाणं तुम्हीच गाणार. अश्विन भंडारे यांच्याबद्दलही नेमकं असंच घडलं. त्यांच्या तोंडून गाणं ऐकल्यानंतर त्यांनाही मी तुम्हीच हे गाणं गाणार असं सांगितलं. चित्रपटाचं संगीत आजच्या पिढीला आवडतंय याचा आनंद आहे. थोडक्यात चित्रपट चांगला झाला असून तो प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया