असेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…
उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘असेही एकदा व्हावे’ हा चित्रपट येत्या ६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी दिलेलं संगीत सध्या खूप चर्चेत आहे. आपल्या नेहमीच्या शैलीच्या विपरीत संगीत देत गुप्ते यांनी संगीतरसिकांकडून कौतुकाची पावती मिळवली आहे. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.
——–
हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातील गोड आठवण आहे. तो खूप ‘स्पेशल’ असण्यामागचं तीन कारणं आहेत. त्यामधलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक सुश्रुत भागवत. दुसरं कारण म्हणजेही सुश्रुत भागवत आणि तिसरं कारणदेखील सुश्रुत भागवतच आहे. बऱ्याच काळानंतर मला अशा एका दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं की ज्याला स्वत:च्या कथेबद्दल, दिग्दर्शनाबद्दल प्रचंड विश्वास होता. या चित्रपटात मी तीन वेगवेगळ्या जॉनरची गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेगळा प्रयत्न करायला मला नेहमीच आवडतं. परंतु, तसे आपल्याला निर्माते-दिग्दर्शक भेटणं गरजेचं असतं. ‘असेही एकदा व्हावे’च्या निमित्तानं मला ते भेटले हे विशेष. निर्माता किंवा दिग्दर्शक यापैकी मला कोणीही विचारलं नाही की यातलं कोणतं गाणं सणासुदीदरम्यान डीजेवर वाजवलं जाईल. अशाप्रकारची गाणी त्यांनी मागितली नाहीत. हा त्यांचा मोठेपणा आहे. सुश्रुतची कथा अतिशय तरल आहे, ती त्याच्या मनातून आली आहे.
एखाद्या कवितेसारखी ही कथा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतर संगीतकारांना माझा हेवा वाटणार आहे. अशाप्रकारचं संगीत देण्याची संधी अवधूतला कशी मिळाली, असा प्रश्नही काहींना पडेल. वैभव जोशी हा फार मोठा कवी आहे. तो खूप ‘स्पॉंटेनियस’ आहे. हल्ली गाण्यांचे बोल हे खूप कमी शब्दांचे असतात. ते प्रेक्षकांना आवडतातदेखील. ‘ऐका दाजिबा’सारखं गाणी आम्हीच करून ठेवलंय. त्यामुळे त्याबद्दल कोणालाच दोष देता येणार नाही. पण सुश्रुत असा दिग्दर्शक मिळाला की त्यानं पहिल्यांदा माझ्यासमोर एक कविता ठेवली. ‘भेटती ती अशी… भेटली पुन्हा… किती आपली वाटते… कधी पाहिल्याविना… हे गाणं जन्मलं. चित्रपटामधील ‘आरजे’ व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नायिकेला अगदी साजेल असे हे शब्द आहेत. या शब्दांहून चांगले शब्द इतर कुणाला सुचतील असं मला तरी वाटत नाही. हे शब्दच एवढे प्रभावी आहेत की माझं ९० टक्के काम संगीताला सुरुवात देण्यापूवीर्च झालं होतं. उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये कंपोझिंग आलं. वैभवनं लिहिलेलं हे काव्य खूप चांगलं आहे. उमेश-तेजश्री या जोडीवर ही गाणी चित्रीत झाल्यानं त्यांची गोडी आणखी वाढली आहे. तेजश्रीनं माझ्या ‘झेंडा’ या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यामुळे आपलं ‘फाईंड’ पुढं जाताना पाहताना एक वेगळाच आनंद होतो.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया