नाटकापेक्षा चित्रपटात काम करणं अवघड – अशोक सराफ
१९८५चा एप्रिल महिना. कोल्हापूरचा निसर्गरम्य परिसर. सकाळची वेळ. आम्ही- मी आणि ‘रसरंग’चे सहसंपादक विजय जानोरकर स्टुडिओत प्रवेश करतो. कालपरवापर्यंत येेथे प्रवेशद्वारावर ‘शांतकिरण’ अशी पाटी झळकत असलेली. पण आता तिची जागा ‘शालिनी स्टुडिओ, कोल्हापूर’ या नव्या पाटीनं घेतलेली.
शालिनी स्टुडिओत आता तसं काही उरलेलं नाही. सेटिंग्जचं साहित्य आहे आणि जागा आहे. कामगारांपासून चहापाण्यापर्यंत सारं काही बाहेरून आणून शूटिंग करायचं. स्मिता आर्टच्या ‘छक्के पज्जे’ चित्रपटाचं शूटिंग येथे सुरू होतं. दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांनी अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यावरील एक महत्त्वाचा शॉट नुकताच चित्रित केलेला. दरम्यान ध्वनीमुद्रण यंत्रात बिघाड झाल्यानं पुढचं शूटिंग ठप्प झालेलं.
कोपर्यातून अशोक सराफ मिस्किल लुक देतो. आमचा मोर्चा तिकडे वळतो. आज प्रामुख्यानं त्याची भेट आणि मोकळेपणानं मुलाखत हाच या शालिनीमध्ये येण्याचा मुख्य हेतू होता ना!
अशोक सराफ एकदम खुशीत. बाविसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या बावीस चित्रपटांपैकी बरोबर निम्मे अकरा चित्रपट- त्याच्या प्रमुख भूमिका असलेले! हा या चित्रपट महोत्सवातील वेगळा विक्रमच. त्यातील ‘बहुरूपी’मधील सावळ्यानं त्याला यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलेलं. सोबत शिवाजी गणेशन पुरस्कर मिळालेला.
गेल्या अकरा वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत यापूर्वी अशोकनं अभिनेता आणि विशेष अभिनेता म्हणून चांगला सहा वेळा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून घेतलेला. पण यंदा त्याच्याच भूमिकांची एकमेकांशी मजेदार स्पर्धा लागलेली.
या भूमिकाही विविध प्रकारच्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’, ‘सगेसोयरे’, ‘सव्वाशेर’, ‘ठकास महाठक’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘बहुरूपी’, ‘गुलछडी’, ‘हेच माझं माहेर’, ‘श्रद्धा’, ‘नवरी मिळे नवर्याला’ आणि ‘जुगलबंदी’ हे अशोकची भूमिका असलेले या चित्रपटमहोत्सव स्पर्धेसाठी दाखल झालेले अकरा चित्रपट.
‘‘हार्दिक अभिनंदन! सरकारकडून आपला आणखी एकदा गौरव झाला!’’ आमची मुलाखत सुरू होते. अशोक सराफच्या चेहर्यावर स्मित हास्य झळकतं. तो सावरून वगैरे बसतो. मुलाखतीसाठी किंचित गंभीरही होण्याचा प्रयत्न. पण त्यात यश येत नाही आणि अशोककडून आम्ही त्याची अपेक्षाही करीत नाही. त्याच्या कलाजीवनातील यशापयशाची मनमोकळी चर्चा करणं एवढी आमची अपेक्षा. अशोकनं त्यासाठी दिलखुलासपणे बोलावं.
‘‘तुझे एकाच वेळी एवढे चित्रपट महोत्सवी स्पर्धेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी इतर कोणत्या कलावंताला असं भाग्य लाभलेलं नाही. तेव्हा यंदा सर्वोत्तम अभिनेत्याचं पारितोषिक लाभेल अशी खात्री वाटत असणारच. पण त्यापैकी कोणत्या भूमिकेबद्दल हे पारितोषिक लाभेल असं वाटत होतं?’’ आम्ही सरळ सरळ मुद्यालाच हात घालतो.
‘‘खात्रिबित्री काही नाही हं!’’ सर्वांग घुसळीत अशोक मनमोकळेपणं हसत उद्गारतो. आम्हाला आनंद होतो. कारण आता नेहमीचा खोडकर अशोक सराफ आमच्या समोर बसलाय याची पूर्ण खात्री पटते.
‘‘त्याचं काय आहे, आपण बक्षिसाची अपेक्षा करायची नि ते नाही मिळालं तर रडत, कोकलत बसायचं असंच व्हायचं असतं तेव्हा विचारच न केलेला बरा. परीक्षकांची मतं कशी भिन्न भिन्न! कोणाला काय आवडेल नि कोणाला भावेल हे सांगणं अवघडच. तरीही मला ‘बहुरूपी’मधील भाबड्या ‘सावळ्या’च्या भूमिकेबद्दल खूपच अपेक्षा होत्या. त्यामुळं माझ्या अपेक्षेप्रमाणेच निकाल लागल्यानं मला अपेक्षापूर्तीचा आनंद मिळालाय!’’
‘‘या ‘बहुरूपी’मधील या सावळ्याच्या भूमिकेचं वेगळं वैशिष्ट्य काय?’’
‘‘ती अगदी वेगळ्या प्रकृतीची आहे हेच वेगळं वैशिष्ट्य. एका साध्या भोळ्या तरुणाची ही भूमिका. सावळ्या त्याचं नाव. सावळ्या अत्यंत गरीब. दोन वेळा जेवण मिळण्याची पंचाईत, बायको अकाली निधन पावलेली. ५-६ वर्षांचं मूल. पण ते सदैव आजारी पडणारं. त्याला औषधोपचार करण्यासाठी सावळ्याजवळ पैसा नाही. एकदा मूल खूपच आजारी पडते. हा पैशासाठी दारोदार हिंडतो. पण त्याला प्रत्येक ठिकाणी नकारच मिळतो. त्याच्या डोळ्यादेखत त्याचं मूल औषधाअभावी तडफडून मरतं. एकापरी तो सर्व पाशातून मुक्त होतो.
‘‘विविध सोंगं घेऊन हसविणं, करमणूूक करणं हा त्याचा- बहुरूप्याचा- धंदा. एकदा तो पोलिस इन्स्पेक्टरचा वेष घेऊन जंगलातून हिंडत असताना एके ठिकाणी दरोडेखोर त्याला दिसतात.
त्यांनी फार मोठी चोरी केलेली असते. त्याला खराखुरा पोलिस इन्स्पेक्टर समजून ते आपल्या जवळचं पैशाचं गाठोडं तसंच तेथे टाकून पळून जातात. सावळ्या हे सारे पैसे गोळा करतो आणि गरीब मुलांना त्यातून मदत करू लागतो. आपलं मूल औषधोपचाराभावी गेलं याचं दु:ख त्याच्या पोटात असतं. त्यामुळे याला मुलाबद्दल कणव. पण चोरीचं धन पोलिसात जमा न करता त्याचा स्वत:च वापर केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक होते. तुरुंगवास घडतो.
‘‘या सर्व प्रवासात त्याच्या जीवनात, शिक्षिका असलेली एक तरुण विधवा येते. तिला एक मूल. ते पांगळं. तिला या सावळ्यांबद्दल ममत्व वाटू लागतं त्यामुळं त्याला पोलिस पकडून नेतात. तेव्हा तिचे डोेळे भरून येतात आणि याच वेळी तिच्या हातून पुस्तक खाली पडतं. त्याचं नाव असतं, ‘प्रतिक्षा’. यातून बरंच काही सूचित होतं.
‘‘तशी ती मोठी अफलातून कॉमेडी आहे, वा चार्ली-चॅपलीन छाप तिला दु:खाची किनार वगैरे आहे, वा ती हसता हसता रडविते अशातला भाग नाही. जे काही आहे ते मनाला चटका लावणारं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोल्हापूरसारख्या ठिकाणी अनेक अडचणींना तोंड देत, ससे-रणदिवे या तरुणांनी हा वेगळा चित्रपट अवघ्या २५-२६ दिवसांचं सलग शूटिंग करून आकाराला आणला हे विशेष. मला या तरुणाचं खूप कौतुक वाटलं त्यामुळंच हा सावळ्या रंगविताना मी आनंदित झालो होतो. काही तरी वेगळं मी करीत होतो व म्हणूनच या जाणीवपूर्वक होत असलेल्या प्रयत्नाची दखल घेतली गेली पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं. सरकारी पातळीवरून तसं ते मिळालं याचा जरूर आनंद झाला.’’
‘‘महोत्सवासाठी दाखल झालेल्या तुझ्या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेविषयी थोडक्यात माहिती देऊ शकतील का?’’
‘‘हो, हो, का नाही! प्रत्येक भूमिका आठवतेय. या सर्वच भूमिकांचं मूळ पाया विनोद हाच आहे. पण त्याच्या छटा वेगवेगळ्या आहेत. यापैकी ‘जुगलबंदी’ या एकाच चित्रात मी खलनायक आहे. ही भूमिका तशी चटकन प्रेमात पडावं अशीच. कागदावर तिचा चांगला ठसा उमटलेला होता. स्व. बिमल रॉय यांच्या ‘मधुमती’मधील प्राणची भूमिका आठवत असेल तर या भूमिकेची चटकन कल्पना येईल. यातही पुनर्जन्म वगैरे प्रकार आहेच. हा जुन्या काळातील संस्थानिक. पण एकूण सारा मामलाच फसलेला. ही भूमिका हवी तशी विकसित झाली नाही, त्यामुळं ती पडद्यावर परिणामशून्य ठरली. अशा वेळी श्रम वाया गेल्याचं दु:ख होतं.
‘‘ ‘कुलस्वामिनी अंबाबाई’मधील भूमिकेचा बेस कॉमेडी; पण या व्यक्तिरेखेला सहानुभूतीची झालर. तो घरजावई आहे. पत्नी कजाग आणि सासू तोंडाळ अशा कात्रीत तो सापडलेला. त्यामुळं त्या घरी नव्यानं येणार्या सुनेचा चाललेला छळ त्याला सहन होत नाही. तो तिला सहानुभूती जरूर दाखवितो; पण स्वत:च सासुरवाडीला तुकडे मोडीत पडल्यामुळं त्याचं काहीच चालत नाही. आतल्या आत धुसफुसत रहातो.
याच्या उलट ‘बिनकामाचा नवरा’मधील तुका आहे. हा नवरा महा चालू, कमालीचा इरसाल. सर्व गावाला शेंडी लावायला निघालेला. बायको महामायेचा अवतार; पण त्याच्यावर जीव टाकणारी… त्यामुळं ती बापडी राबराब राबणारी आणि हे महाशय गावभर हिंडून फुकट गिळणारे.
‘‘या दोन्ही चित्रपटात रंजनानंच माझ्या बायकोची भूमिका केलेली. महोत्सवातील चित्रपटात आमचे दोघांचे हे दोनच चित्रपट. दोन्ही भूमिकात चांगला रंग भरला. कारण रंजनाकडून उत्तम रिस्पॉन्स मिळतो. विनोद रंगायला टायमिंग महत्त्वाचं. अशा वेळी दोन कलावंतांचे सूर अचूक जुळले की जुगलबंदी हमखास रंगते.
‘‘ ‘सगे सोयरे’मध्येही रंजना होती. पण त्या चित्रपटात आमचा संबंधच आलेला नाही. या चित्रपटातील बबन्या सोनार हा देखील इरसाल नमुनाच या चित्रपटात मी बाप-बेटा अशी दुहेरी भूमिका रंगविली आहे. बाप अट्टल दारूड्या. बेटा मात्र दारुला स्पर्श करीत नाही. पण एकदा ती तोंडाला लागल्यावर तो जी धमाल उडवितो ती हसविणारी. हा बबन्या नाना हिकमती लढवून गावच्या दुष्ट इमानदाराचा आणि त्याच्या पोराचा काटा काढतो.
‘‘असा ‘बाप-बेटा’ मी निर्माते बिपिन वर्टी यांच्या ‘मायबाप’मध्ये रंगविला होता. तो चित्रपट चालला म्हणून मग त्यांनी आपल्या या ‘सगे सोयरे’मध्ये पुन्हा बाप-बेट्याच्या भूमिका मला दिल्या! बिपिन वर्टी यांचा हा ‘सगे सोयरे’ देखील चांगला चालला तेव्हा आता हीच बाप-बेट्याची परंपरा पुढं चालू राहाणार असं दिसतं.
‘‘ ‘मायबाप’चं दिग्दर्शनं सचिननं केलं होतं. या पहिल्याच चित्रपटात त्याच्या अंगच्या दिग्दर्शन-चातुर्याची उत्तम झलक दिसली होती. यावेळी ‘सव्वाशेर’ आणि ‘नवरी मिळे नवर्याला’ या दोन चित्रपटात त्याच्या दिग्दर्शनाखाली मी भूमिका केल्यात. यापैकी ‘सव्वाशेर’मध्ये माझा डबलरोल आहे. पण एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी रूपे असलेला अत्यंत हळवं तर दुसरं कमालीचं कडक. एकाच वेळी दोन वेगळ्या भूमिकांचं अचूक बेेअरिंग सांभाळून कॅमेर्यापुढं वावरणं म्हणजे कसरतच. पण तशी ती करताना आनंद वाटत होता. कारण या व्यक्तिरेखा अगदी सुस्पष्ट, रेखीव झालेल्या. सचिननं या चित्रातील रहस्य मोठ्या कुशलतेनं खेळविलं आहे. क्लायमॅक्स तर जबरदस्त. अगदी उत्कंठा वाढविणारा. विनोदाची पार्श्वभूमी ठेवूनही केवढं गंभीर वातावरण निर्माण करता येतं? हे ‘सव्वाशेर’ पाहताना अनुभवता येतं. साध्याभोळ्या दुकानदार भावाला सारे फसवितात म्हणून त्याचा लष्करी शिस्तीत वाढलेल्या कडक स्वभावाचा कॅप्टन भाऊ गावात पदार्पण करतो आणि येथूनच खरं नाट्य रंगू लागतं. शेवटी तर भावाच्या खुनाबद्दल दुसर्या भावावरच खटला भरला जातो. हा सारा भाग जितका रंजक तितकाच उत्कंठा वाढविणारा.
‘‘सचिन दिग्दर्शित ‘नवरी मिळे नवर्याला’मधील भूमिकेचा बेस कॉमेडीच आहे. संस्थानिकाचा हा खुशाल चेंडू पोरगा. बाळासाहेब त्याचं नाव. कमालीचा आळशी. कामधंदा शून्य. संस्थानिकाची पोरं अशी वागतात तसाच तो वागणारा. त्याला शिकारीचा नाद. फारसा डोक्याला ताण नसलेला हा लाइट कॉमेडी रोल.
‘‘सुषमाच्या ‘गुलछडी’मधील नायक गजाही असाच. तो रंगविताना मला विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. मसालेदार चित्रपटातील सर्वगुणसंपन्न नाटक जसा महामानव- सुपरमॅन असतो. तसाच तो या गुलछडीतील. तो विनोदी ढंगाचा एवढंच. मातापित्याच्या खुनाचा सूड घेणं हे त्याचे ध्येय. ते साध्य करण्यासाठी प्रसंगी तो लुगडं नेसून स्त्री वेषही धारण करतो. स्त्री वेषात एक गाणंही म्हटलंय. विनोदी नटाला एकदा तरी लुगडं नेसून पडद्यावर वावरावंच लागतं. आमच्या वाट्याला या गुलछडीत लुगडं आलंच.
‘‘या ‘गुलछडी’मध्ये मी लुगडं नेसतो. तर ‘ठकास महाठक’मध्ये मी मोहन गोखलेला लुगडं नेसवितो. नाथमाधव यांच्या खूप गाजलेल्या ‘सोनेरी टोळी’ या कादंबरीवरील या चित्रपटातील राया रंगविताना मला खूप गंमत वाटली. कारण यातील राया ठकवाठकवी करताना सारखे वेष बदलीत असतो. जसा वेष तसं त्या भूमिकेचं बेअरिंग. त्यामुळे काम अवघड होतं. पण सारा चित्रपट विनोदी अंगानं खुलत फुलत गेल्यानं फारसं टेन्शन आलं नाही.
‘‘ ‘बहुरुपी’बद्दल मी मगा सांगितलंच आहे. ‘श्रद्धा’बद्दल फारसं काही सांगण्यासारखं नाही. ‘हेच माझे माहेर’ या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या चित्रपटातील माझी भूमिका मात्र सहानुभूती मिळविणारी आहे. हा आश्रित म्हणून वावरणारा, तो कन्नड भाषिक आहे आणि दोन पिढ्यात वावरणारा. म्हणजे येथेही जुगलबंदीप्रमाणे तरुण ते वृद्ध असा प्रकार आहे. पण या व्यक्तिरेखेला कथेचा मजबूत आधार आहे. संपूर्ण चित्रपटच वेगळा, कथा कसदार, त्यातील माझ्या भूमिकेचं स्थान वेगळं. कन्नड स्टाईलनं संवाद बोलल्यामुळे हशा जरूर पिकतो. पण ही लाईट कॉमेडी नव्हे.
‘‘ह्या सर्वच भूमिका तशा विनोदी आहेत पण त्यात वेगळेपणा काय आहे!’’
‘‘अशोक सराफची भूमिका ती विनोदीच असणार असं जणू ठरूनच गेलंय.
त्यामुळं भूमिका करताना त्या दृष्टीनं मर्यादा या पडणारच. तरीही मी माझी प्रत्येक भूमिका विनोदीबाजी असली तरी भूमिकेत वेगळेपणा आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. या वर्षभरात किमान डझनभर चित्रपट लागोपाठ लोकांपुढं आले. पण प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी करण्याचा प्रयत्न केल्याने माझा कामात तोचतोपणा जाणवलेला नाही. वेगळेपणा दाखवला नसता तर डझनावारी एकछाप भूमिका पाहून पब्लिकनं माझ्या नावानं नक्कीच बोबाबोंब केली असती की नाही?’’
‘‘तू राजाभाऊ परांजपे यांच्यानंतर मराठी चित्रपट विनोदाचा वेगळा ट्रॅक सुरू केला आहेस असं म्हटलं जातं हे मान्य आहे का? त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत का?’’
‘‘त्या थोर कलावंताशी मी माझी बरोबरी मुळीच करू इच्छित नाही. मराठी पडद्यावर राजाभाऊ गोसावी व दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ला लाभलेल्या यशानंतर विनोदी चित्रपटाची एक वेगळीच मालिका निर्माण झाली. दादांच्या ‘पांडू हवालदार’नंच मला सर्वप्रथम विनोदी नट म्हणून पदड्यावर आणलं व गाजविलं. त्यांच्या ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्यानं मला खूप नाव मिळवून दिलं पण मी कधी स्वत:ला टाईप होऊ दिलं नाही. की स्वत:ची विशिष्ट इमेजही मी बनविली नाही. आपल्या कामात ताजेपणा यावा म्हणून विनोदाचे वेगवेगळे प्रकारही हाताळतोय. केवळ फर्सिकल, कॉमेडीवरच मी थांबलेलो नाही. माझे ‘गोंधळात गोंधळ’, ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘अरे संसार संसार’सारखे चित्रपट ज्यांनी पाहिले आहेत त्यांना माझ्या या विधानाची सत्यता निश्चित पटेल.
‘‘अनेकदा मी माझ्या वेषभूषेत वेगळेपणा आणला आहे. हावभावाचा योग्य त्या जागी उपयोग केलाय. ‘अरे संसार संसार’मध्ये मी धनलोभी, स्त्रीलंपट सावकार रंगविताना स्त्री पाहताच डोळा उडविला आहे, ओठांवरून जीभ फिरविली आहे, तोंडाला पाणी सुटण्याचं भासविण्यासाठी. नायिकेवर त्याचा डोळा. ती आपल्या पलंगावर यावी ही त्याची जबर इच्छा. दोघंही जख्खड म्हातारी होतात, पण त्याची इच्छा काही पूर्ण होत नाही की त्याची तिच्याविषयीची आसक्तीही कमी होत नाही. त्यामुळं शेवटपर्यंत तिला पाहिलं की त्याचा डोळा फडफडतोच, ओठावरून जीभ फिरू लागतेच.
‘‘याबाबतची एक गंमत सांगतो. ‘अरे संसार संसार’ पुण्यात प्रदर्शित झाल्यानंतर पुण्याच्या एका चित्रपट समीक्षकानं ह्या हावभावाबद्दल मला विचारलं. मी या सार्याच्या सविस्तर खुलासा करताना तो सावकार हताश, निराश कसा झालाय व त्यातूनच पेटलाय हेच मला दाखवायचं होतं हे त्या चित्रपटसमीक्षकाला मी सांगितलं.’
‘‘मग त्यात काय आहे? पहिल्या दृश्यात तसं एकदा दाखवून एस्टॅब्लिश केलं म्हणजे झालं!’’ तो चटकन उद्गारला.
मी कपाळाला हात लावला. म्हणजे एखादं पात्र लंगडं असेल तर पहिल्या दृश्यात त्याला लंगडताना दाखविलं की बस्स. पुढं संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांनी समजायचं की हा लंगडा आहे म्हणून, अशातलाच हा प्रकार!’’
‘‘तुझी लोकप्रियता पाहून, तुला डोळ्यांसमोर ठेवून भूमिका लिहिल्या जातात असं लक्षात येतं का?’’
‘‘जात असाव्यात! मला यंदा राजमान्यता मिळवून देणारा ‘बहुरुपी’ मला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिला गेला. एखादा कलावंत डोळ्यासमोर ठेवून जेव्हा एखादी व्यक्तिरेखा आकार घेते, तेव्हा त्या कलावंताला निश्चितच भरपूर वाव मिळतो. पण त्याचबरोबर त्याच्यावर जबाबदारीही तेवढीच पडते. ‘गोष्ट धमाल नाम्याची’ लिहून पूर्ण झाल्यानंतर निर्माते गिरीश घाणेकर मला म्हणाले, ‘अशोक हा नाम्या, म्हणजे तूच बरं का! तुलाच डोळ्यासमोर ठेवून त्याला सारी ट्रिटमेंट दिलीय!’’
‘‘पण हा नाम्या, हसरा, नाचरा होता. तू डान्स वगैरे केलाय. त्यासाठी काही खास शिक्षण!’’
‘‘नाही, तसं काही खास शिक्षण नाही घेतलं. पण मला र्हिदमचा सेन्स आहे. अशा नृत्यांच्या वेळी त्याचा चांगला उपयोग होतो. मला गाण्याचंही अंग आहे. मी अगदीच बेसूरा नाही. रंगभूमीवर फाल्गुनराव, लक्ष्मीधर, शिष्यवर आदी रंगविताना त्यांची गाणी मी गात असे. ‘मदनाची मंजिरी’मध्ये मी ठणकावून गात असे. अलिकडे ‘सगेसोयरे’मध्ये मी गायलो नाही. गाण्यासाठी आधी तालीम वगैरे तयारी हवी; पण त्यात काही कडवी सुरात म्हटली आहेत.’’
‘‘विनोदी नट म्हणून पब्लिकमध्ये जी इमेज निर्माण झालीय तिचा पडद्याबाहेर काय अनुभव येतो?’
‘‘लोकांना मी विनोदी आहे असंच वाटतं. पण मी मुळात तसा नाही हो! मी अगदी गंभीर प्रकृतीचा कलावंत आहे. खाजगी जीवनात लोकांना हसविणं मला मुळीच जमत नाही. त्यामुळं मी कुठं भाषणबिषण करायला जात नाही. लिहिलेले संवाद बोलून लोकांना हसविणं एवढंच मी जाणतो. पण लोक माझ्याकडून भलतीच अपेक्षा करतात. भाषणातही विनोदी किस्से सांगून मी त्यांना हसवावं असं त्यांना वाटतं. मला ते मुळीच जमत नाही. हजारो लोकांसमोर मी विनोदी भाषण करू शकणार नाही. ती वेगळीच कला आहे.’’
‘‘अनेकदा मी हास्यास्पद होतो. आता मी लोकांत फारसा मिसळत नाही. पण चित्रपट, नाटक आणि स्टेट बँकेतील नोकरी असे चालू होते तेव्हा असे चकित वा खजील होण्याचे प्रकार अनेकदा घडलेत.
‘‘असाच एकदा मी मुंबईहून कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसने शूटिंगला चाललो होतो. मी जनता डब्यात होतो. माझा ‘पांडू हवालदार’ चित्रपट तेव्हा गाजून गेला होता. डब्यात मला पाहून काही जणांत कुजबुज सुरू झाली. त्यात एक रेल्वेपोलिसही होता. त्यानंच थोड्या वेळानं मला विचारलं, ‘‘तुम्ही पांडू हवालदारमधील सखाराम हवालदार बनलेले अशोक सराफ ना?’’ मी स्मितहास्य करीत होकारार्थी मान हलवली.
मनातून मी भलताच खूष झालो होतो. त्यानं मग इतरांना मी मोठा नट वगैरे असल्याचं सांगितलं. कौतुकाच्या चार नजरा माझ्यावर खिळल्या.
‘‘त्यानं मग आपल्या शेजारी बसलेल्या दुसर्या पोलिसाला म्हटलं, ‘अरे हे पांडू हवालदारमधले अशोक सराफ! ओळखलं की नाही यांना?
‘‘मी केव्हाच ओळखलं. पण हा एवढा मोठा नट असा जनता क्लासमधून प्रवास करील असं नव्हतं वाटलं!’ तो चेहरा गंभीर करीत उद्गारला मात्र, मी पार खलास झालो. तोंड दुसरीकडे फिरवून त्यावर चादर ओढली नि झोपी गेलो. त्यानंतर पुन्हा म्हणून जनता क्लासमधून प्रवास केला नाही.
‘‘असाच आणखी एक प्रसंग. मी तेव्हा स्टेट बँकेत नोकरी करीत होतो. माझे दोन-चार चित्रपट पडद्यावर झळकले होते. मी ताडदेवला भाटिया इस्पितळाजवळ राहतो. अशाच सकाळी कामावर जाण्यासाठी बस पकडली. गर्दी असल्यामुळं उभं राहूनच प्रवास करीत होतो. एका प्रवाशानं माझ्याकडे पाहिलं. पुन: पुन्हा पाहिलं आणि काहीशा मोठ्यानंच म्हणाला, ‘अरेरे! काय हा मराठी सिनेनटाची अवस्था!’ तेव्हा माझी अवस्था खरोखर दयनीय झाली होती. पुढच्याच स्टॉपवर मी निमूटपणे बसमधून खाली उतरलो.’’
‘‘अशोक, तुझ्या भूमिकांतील तुला आवडलेले विनोदी प्रसंग सांग ना!’’
‘‘पांडू हवालदारमधील बेरक्या सखाराम हवालदारनं मला एकदम प्रसिद्धीच्या झोतात आणलं. तसा हा सखाराम हवालदार या चित्रातला खलनायक. नाना उचापती करून पैसे खाणारा. अनेक वस्तू घरात आणणारा. मासळी, कोंबडीवरही तो राजी होणारा. हातात कोंबडी हलवीत होणारी त्याची एंट्रीच भरपेट हसवणारी.
————
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया