मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख असलेल्या कलाकारांमध्ये चिन्मय मांडलेकर अभिनेता आहे. ज्याच्याकडे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून प्रेक्षक बघतात. त्याची एक खासियत म्हणजे तो फक्त अभिनयच करत नाहीतर एक चांगला लेखकसुद्धा आहे. त्याने अनेक प्रसिद्ध मालिकांसाठी लिखाण केले आहे.
चिन्मय मांडलेकरची कलाक्षेत्रातील प्रवासाची सुरवात झाली ती विलेपार्ल्याच्या एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर. अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमार्फत त्याच्या अभिनय कौशल्याला योग्य ती संधीच मिळाली. कॉलेज शिक्षण झाल्यावर चिन्मयने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला. एनएसडीचा पदवीधर म्हणून मराठी दूरचित्र वाहिनी क्षेत्रात त्याचे स्वागत झाले आणि 'वादळवाट' या दूरदर्शनवरील मराठी मालिकेत काम करत असताना त्याने एक छंद म्हणून मधल्या काळात एक स्क्रिप्ट लिहिले आणि 'क्षण' या चित्रपटाच्या निमित्ताने सन २००६ला चिन्मय एक चित्रपट कथा लेखक म्हणून समोर आला. मात्र त्याला लेखक म्हणून खरी प्रसिद्धी मिळाली ती 'असंभव' या मालिकेद्वारे. चिन्मयला लेखनाची गोडी 'वादळवाट' करत असतानापासूनच निर्माण झाली व एक सहलेखक म्हणून त्याने काम केले होते. चिन्मय मांडलेकर निर्मितीक्षेत्रात देखील आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मालिकेद्वारे त्याने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले. त्याने निर्मिती केलेली ही मिनी सिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि ‘सख्या रे’ या मालिकेची तो निर्मिती केली आहे. तो लेखनासोबतच अनेक मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करतो आहे. मोरया, पांगिरा, झेंडा, गजर, चिरगुट, प्यारवाली लव्हस्टोरी, हलाल, लोकमान्य एक युगपुरुष हे त्याचे महत्त्वाचे चित्रपट. 'फत्तेशीकस्त', 'हिरकणी' हे चिन्मयचे अलीकडील महत्वाचे चित्रपट. 'एक थी बेगम' ह्या वेब सिरीजमधील त्याची भूमिका गाजली.
-मंदार जोशी
संदर्भ.इंटरनेट