चित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अभिनेता म्हणून आनंद अभ्यंकर यांचा लौकिक होता. ते नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये शिकले. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड. ती त्यांनी कॉलेजमध्ये जाईपर्यंत जोपासली. उच्च शिक्षणासाठी ते नागपूरहून पुण्यात दाखल झाले. इथे त्यांच्या कलेला अधिक वाव मिळाला. गरवारे महाविद्यालयामधून ते वाणीज्य शाखेतील पदवीधर झाले. पुण्यात एका खासगी संस्थेत काम केल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. सुरुवातीच्या काळात त्यांना मोहन जोशी यांची साथ मिळाली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ ही त्यांची उल्लेखनीय नाटके. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या त्यांच्या गाजलेल्या टीव्ही मालिका. ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’, ‘दुनियादारी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. २३ डिसेंबर २०१२ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
मंदार जोशी