चित्र-चरित्र

केशवराव दाते
केशवराव दाते
अभिनेते
२८ सप्टेंबर १८८९ --- १३ सप्टेंबर १९७१

केशवरावांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील अडिवरे येथे झाला. ते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील मरण पावले. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी केशवरावांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम केले. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका. पुढे एका हितचिंतकाच्या मध्यस्थीने त्यांनी २० मे १९०७ रोजी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला. ‘कीचकवध’ हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीच्या रंगभूमीवर २२ फेब्रुवारी १९०७ रोजी आले; तेव्हापासून त्या नाटकाचा व त्या नाटकातील गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेचा अतिशय बोलबाला झाला होता. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली (१९०८). त्यामुळे त्यांना भागवतांच्या अभिनयकौशल्याचे अगदी जवळून दर्शन घडले. कोणत्याही भूमिकेचा कसा आणि किती विचार केला पाहिजे, नटाच्या जीवनात शिस्तीची आणि चारित्र्याची किती गरज असते आणि नटाने प्रत्येक भूमिका रंगभूमीवर कशी जगली पाहिजे, याचे शिक्षण केशवरावांना भागवतांच्या सान्निध्यात मिळाले. महाराष्ट्र नाटक मंडळीचे मालक त्र्यंबकराव कारखानीस आणि नाटककार खाडिलकर या दोघांना केशवराव गुरूस्थानी मानत.

महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकांत केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाच्या भूमिका करू लागले. प्रेमसंन्यास नाटकातील जयंत (१९१२), सत्वपरीक्षा नाटकातील हरिश्चंद्र (१९१४), पुण्यप्रभाव नाटकातील वृंदावन (१९१६) आणि विचित्रलीला नाटकातील विचित्र (१९१६) या त्यांपैकी काही ठळक भूमिका होत. केशवरावांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर १९१७ साली झाला. रमाबाईंची सोबत केशवरावांना ३० जानेवारी १९६८ पर्यंत लाभली. आपल्या सुखी आणि नेटक्या संसाराचे सारे श्रेय केशवराव रमाबाईंना देत असत.

महाराष्ट्र नाटक मंडळीचे १९१९ साली केशवराव एक भागीदारमालक झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बेबंदशाही नाटकातील गणोजी शिर्के (१९२४), खडाष्टक नाटकातील कवीश्वर (१९२७) व सवतीमत्सर नाटकातील राम (१९२७) या भूमिका उत्कृष्ट रीतीने केल्या. महाराष्ट्र नाटक मंडळीच्या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर १९२० ते १९३४ या काळात केशवरावांनी समर्थ नाटक मंडळी व नाट्यमन्वंतर या संस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या. समर्थ नाटक मंडळीच्या आग्र्याहून सुटका या नाटकातील औरंगजेब (१९३०) आणि नाट्यमन्वंतराच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील मनोहर (१९३३) या भूमिका त्यांनी गाजविल्या. केशवराव हे उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नट आणि नाट्यशिक्षक अशा दोन्ही भूमिका करून त्यांनी नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाट्यसंस्थेला कलात्मक यश आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून दिली. बोलपटांच्या आगमनानंतर केशवरावांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन (१९३५), कुंकू (१९३७) आणि शेजारी (१९४१) या चित्रपटांत तसेच बाबूराव पेंटर यांच्या शालिनी सिनेटोन निर्मित सावकारी पाश (१९३६) या चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरात शांताराम यांचे सहकारी आणि सल्लागार या नात्याने केशवराव यांनी १९४२ ते १९६७ या काळात अतिशय मोलाची कामगिरी केली. ‘राजकमल’च्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील त्यांची भूमिका बरीच लोकप्रिय झाली होती. केशवराव चित्रपटसृष्टीत रंगले होते. तरी त्यांचे मन मात्र रंगभूमीवरच गुंतलेले असे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या भाऊबंदकी नाटकाला भारताच्या राजधानीत पहिले पारितोषिक मिळाले (१९५४); त्याचे दिग्दर्शन केशवरावांनीच केले होते. संघाच्या सवाई माधवराव यांचा मृत्यू या नाटकात केशवशास्त्र्यांची भूमिका करून (१९४६–६३) केशवरावांनी त्या समर्थ शोकांतिकेला जिवंत केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मंगलदिनी (१ मे १९६०) राजकमल कलामंदिराच्या नाट्य शाखेने केलेल्या शिवसंभव नाटकाचा प्रयोग प्रत्यक्ष शिवनेरी येथे करण्यात आला; त्या प्रयोगाचे दिग्दर्शक केशवराव होते. रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना १९६४ साली संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतिपदक मिळाले. ‘नोच्यार्थो विफलोऽपि दूषणपदम्‌ दूष्यस्तु कामो लघु:|’ हे महाराष्ट्र नाटक मंडळींचे ब्रीदवाक्य होते आणि केशवरावांच्या जीवनाचेही तेच सारसर्वस्व होते.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र