रहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…
‘राक्षस’ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत. राक्षसाची विविध रूपेआजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलेली आहेत. तन्मयी देव आणि मी अशी आम्ही दोघांनी मिळून या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचा मूळ धागा माझ्या बालपणाशी निगडीत आहे. आपल्या आजूबाजूचे बहुतेक सगळे चित्रपट वास्तवदर्शी किंवा लिनियर पद्धतीनं घडतात. मात्र मला काहीतरी नव्या पद्धतीचा खेळ करून बघायचं होतं. माझे आई-वडील शिक्षक-शिक्षिका. माझ्या जन्माच्या वेळी ते आदिवासी शाळांमध्ये शिकवायचे. इगतपुरी, औरंगाबादजवळचा काही आदिवासी भाग इथं माझं बालपण गेलं. ते वातावरण, जग माझ्या मनावर बिंबलं होतं. तिथली होळी मला आठवते. इगतपुरीजवळ एक खूप मोठं जंगल होतं. माझी शाळा गावापासून लांब होती. या शाळेत वाघ येऊन बसायचा. तेव्हा शाळेला सुट्टी द्यावी लागायची. पाच-सहा वर्षांचा असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि माझी औरंगाबादला निघून गेलो. तेव्हापासून माझी या भागाबरोबरची नाळ तुटली. मात्र या जागेची कायम मला ओढ राहिली.
‘‘ही निव्वळ रंजक चिल्ड्रेन स्टोरी नाही. एक मुलगी आपल्या आईसोबत वडिलांच्या शोधासाठी जंगलात शिरतात, या लाइनवर मग आम्ही चित्रपट पुढे नेला. आई आपल्या अनुभवाच्या आधारे या जगाचा शोध घेते तर मुलगी आपल्या कल्पनेच्या आधारावर हे जग पाहते. त्याच्यातून ती एक कोडं सोडवण्याचा प्रयत्न करते. पुढे ‘सनडान्स’ फिल्म स्क्रीप्ट लॅबपर्यंत ही स्क्रीप्ट पोचली. यापूर्वी ‘लंच बॉक्स’ हा चित्रपट इथं निवडला गेला होता. स्क्रीप्ट लिहिण्यासाठी महाश्वेतादेवी, गिरीश कर्नाड तसेच आपल्या अनेक दंतकथांची आम्हाला मदत झाली. ‘सनडान्स’मुळे आम्हाला विवेक कजारिया आणि निलेश नवलाखा भेटले. तत्पूर्वी ही गोष्ट निर्मात्यांना केवळ वाचून दाखवणं कठीण होतं. त्यांना काहीतरी दाखवायला हवं होतं. त्यामुळे मी अडीच मिनिटांचा ट्रेलर तयार केला. तो या दोघांनाही आवडला आणि त्यांनी पटकन लगेच माझ्यावर विश्वास दाखवला. ‘सनडान्स’ची ही पहिली स्क्रीप्ट असल्याचाही मला फायदा झाला. त्यानंतर ही गोष्ट मी सई ताम्हणकरला ऐकवली. ती खूप सर्पोटिव्ह वाटली. सुरुवातीला वाटलं की ती माझी गोष्ट नाकारेल. मात्र तिनं शांतपणे ऐकून हा चित्रपट स्वीकारला. अगदी तसेच शरद केळकरबाबतही घडलं. सईच्या आतापर्यंतच्या पॉप्युलर सिनेमाच्या अगदी विरूद्ध हा चित्रपट आहे. विठ्ठल काळे या नवोदित कलाकारानं खूप छान काम केलं आहे. जे कागदावर आम्ही जग लिहिलं होतं, ते प्रत्यक्ष स्क्रीनवर उतरवण्यासाठी आम्हाला जीवाचा अगदी आटापीटा करावा लागला. गुजरातमधील सापुतार्याजवळील आदिवासी पाड्यात आम्ही काही दिवस चित्रीकरण केलं. त्यानंतर कर्जत, माथेरान, कास पठाराजवळ चित्रीकरण केलं. एकंदरीत वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही ४० दिवस शूटिंग केलं. संपूर्ण चित्रपट खर्या लोकेशन्सवर चित्रीत झालाय. या चित्रपटात एक गुहा पाहायला मिळते. ती मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित गुहा आहे. इथं शूटिंग करताना खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं. समित कक्कड या चित्रपटाचे ‘प्रेझेंटर’ असल्यामुळे हा चित्रपट चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचेल याची मला खात्री आहे.
– ज्ञानेश झोटिंग
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया