अतिथी कट्टा

दिनांक :

मराठी चित्रपटांमधून क्रांतिकारी विचार…

‘ताटवा’ या चित्रपटाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन नुकतेच विख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांच्याशी मराठी चित्रपट आणि संगीताबद्दल झालेल्या चर्चेचा हा गोषवारा.
——-

‌‘ताटवा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ध्वनीफितीच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग नुकताच आला. यावेळी नवोदित संगीत दिग्दर्शक अतुल जोशी यांनी संगीतबद्ध केलेली गीते ऐकली आणि नवीन टॅलेण्ट किती चांगल्या प्रमाणात काम करीत आहे, याची मला खात्री पटली. या चित्रपटातील तीन गीते ऐकल्यानंतरच ती मला खूप आवडली. काही अल्बम्स हे प्रकाशनापूर्वीच ‌‘हिट’ असतात. ‘ताटवा’ हा त्यापैकीच एक असेल, असं मला वाटतं. एखाद्या ‘हिट’ फिल्मचा ‘साऊंड’ जसा हवा, अगदी तसा या चित्रपटाचा आहे. ‘ताटवा’च्या निर्मात्या डॉ. शरयु पाझारे यांनी प्रचंड मेहनत घेऊन चंद्रपूरमधील तीव्र उन्हाळ्यात हा चित्रपट पूर्ण केला. त्यांची मेहनत या चित्रपटामधून प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोचेल. मला या चित्रपटाच्या संगीताबद्दलची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची नवीन ‌‘टीम’. गीतकार, संगीतकार तर नवीन आहेतच, पण गायक-गायिकाही नवीन दमाच्या आहेत. ही सर्व मंडळी चांगली शिकलेली आहेत.

त्यामु‌ळ‌ेच त्यांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आणि चांगला आहे. तो या संगीतामधून साफ डोकावतो.‘ताटवा’ तसेच मराठी संगीतावर काम करणाऱ्या मंडळींकडे पाहताना मला ‘टी सीरिज’चे दिवस आठवले. खूप वेगळ्या पद्धतीचं आणि चांगलं काम या काळात झालं. गीतकार, संगीतकार, गायक-गायिका, रेकॉर्डिस्ट, निर्माते, दिग्दर्शक… अशी सर्व मंडळी मिळ‌ून काम करायची. सर्वच जण नवीन असल्यानं प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. प्रत्येकाला आपल्यामधील टॅलेण्ट प्रेक्षकांपर्यंत, संगीत रसिकांपर्यंत पोचवायचं होतं. त्यामुळेच प्रत्येकानं या काळात आपल्यामधलं ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न केला. त्यामधूनच मग ‌‘आशिकी’, ‌‘दिल है की मानता नहीं’ यासारख्या संगीताची निर्मिती झाली.

मला मनापासून कौतुक वाटते ते मराठी चित्रपटांचं. त्यांच्या निर्मात्यांचं. त्यांच्या दिग्दर्शकाचं तसेच अशा चित्रपटांशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं. अलीकडच्या मराठी चित्रपटांमध्ये किती किती वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर आपल्या चित्रपटांचा गौरव होत आहे. आपले चित्रपट इतर भाषिक चित्रपटांना मागं टाकून सुवर्णकमळ पटकावताहेत. खूप क्रांतिकारी विचार आपल्या मराठी चित्रपटांमधून व्यक्त होत आहेत. मला नाही वाटत हिंदी तसेच किंवा इतर प्रादेशिक चित्रपटांमधून अशाप्रकारचं भाष्य केलं जात असावं. हा नक्कीच आपल्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे. चांगला कथाविचार आणि दिग्दर्शनामुळे चांगल्या कलाकारांचंही टॅलेण्ट पुढं येत आहे. हे निश्चितच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद आहे. तसेच ज्या पद्धतीनं आपण सध्या पुढं जातोय ते पाहता नजिकच्या काळात आणखी काहीतरी मोठं काम आपल्या चित्रपटसृष्टीकडून घडेल, याची मला खात्री आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा…

– अनुराधा पौडवाल

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया