जय मल्हार…
वामनराव कुलकर्ण्यांनी, बोलल्याप्रमाणं आपले रेकॅार्डिस्ट मित्र विष्णुपंत चव्हाण यांच्या भागीदारीत ‘मंगल पिक्चर्स’ची स्थापना केली आणि चित्रनिर्मितीकरता मा.विनायकरावांच्याकडे असलेला ‘शालिनी स्टुडिओ’ भाडयानं घेतला. ‘मंगल पिक्चर्स’चे सूत्रधार म्हणून आले बाबूराव पेंढारकर.
ठरल्याप्रमाणे मी ‘मंगल पिक्चर्स’च्या पहिल्या चित्रपटाचे संवाद लिहिण्याकरता कोल्हापूरला आलो. माझं घर तेव्हा राजारामपुरीत होतं आणि बाबूरावही राजारामपुरीतच राहायला होते. त्यांच्या बंगल्याचं बांधकाम सुरू होतं. तरी बंगल्याचं आऊट-हाऊस तयार झालं होतं. बाबूराव त्या आऊट हाऊसवरच राहत होते. मी राहत होतो, त्या घरापासून अगदी जवळ! आल्या आल्या आमचं ठरलं, की मी सकाळी-दुपारी लेखन करावं आणि चार-पाच वाजता होईल ते लिखाण बाबूरावांना वाचून दाखवावं. माझी पटकथा तयार होतीच, ती त्यांना ऐकवली. माझी ‘वाघ्या-मुरळी’ ही गोष्टसुध्दा वाचायला दिली. बाबूरावांना दोन्ही पसंत होतं. म्हणून उठल्याबरोबर जे मी मानेवर खडा ठेवून बसायचो, ते जेवण होईपर्यंत. जेवल्यानंतर थोडी विश्रांती घेवून लगेच पुन्हा मी लिहायला बसायचो. चार-पाच वाजले, की बाबूरावांकडे जायचो. आमचं चहा-पान होता होताच बाबूराव माझे संवाद ऐकायचे. माझ्या संवाद लिहिण्याच्या बाबतीत एक पथ्य मी सुरुवातीपासून पाळत आलो आहे. संवाद लिहायचे, ते अगदी बोली भाषेत. आपण रोज बोलतो ना, त्या. त्यात कसलाही कृत्रिमपणा किंवा बोजडपणा येऊ द्यायचा नाही. हेतू हाच, की एक तर ते स्वाभविक वाटले पाहिजे आणि दुसरं म्हणजे, नाटकातील काय किंवा चित्रपटातील काय, संवाद हे ऐकल्याबरोबर प्रेक्षकांना कळले पाहिजेत. निबंधाची भाषा एक वेळ बोजड झाली, तरी चालण्यासारखी आहे. कारण वाचक निबंध वाचत असतो असतो. एखादं वाक्य नाही समजलं, तरी ते पुन्हा पुन्हा वाचून तो समजावून घेवू शकतो आणि त्याचं रसग्रहणही करू शकतो. पण संवादांच्या बाबतीत ते शक्य असत नाही. ते एकदाच कानांवर पडतात. चि़त्रपटाची फिल्म तर सारखी पळत असते. संवादाला ‘टाळी’ पडो किंवा ‘हशा’ पिको; रंगभूमीवरला नट थोडा वेळ थांबू तरी शकतो. पण पडद्यावर ते शक्य होत नाही. पडद्यावर ज्याप्रमाणं गाण्याला ‘वन्समोअर’ नाही. त्याप्रमाणं संवादालाही ‘वाहवा’ म्हणून दाद देण्याइतकी उसंत मिळत नाही. म्हणून संवाद हे नेहमी साधेच लिहावे लागतात. अर्थात हा साधेपणा सांभाळतानाही ते अगदीच (ज्याला इंग्रजीत ‘प्रोझेक’ म्हणतात) सपकही होतो कामा नयेत, याची दक्षता घ्यावी लागते.
केवळ आलंकारिक भाषा टाळली, म्हणजे संवाद साधे होत नाहीत. त्यांना स्वतःचं असं एक सौंदर्य असावं लागतं. बोलायला जितके सोपे, तितकेच ते लयबद्ध असावे लागतात. याबाबतीत संवाद-लेखकांनी एक गोष्ट सतत लक्षात घेतली पाहिजे- ‘लय’ किंवा ‘ताल’ हा गाण्यालाच असतो, असं नाही. न्हाणीघरातून बाहेर पडणारी तरुणी अलंकार नसतानाही ज्याप्रमाणं ताजेपणामुळं आपल्या डोळ्यांत भरते, त्याप्रमाणे संवादही भरले पाहिजेत. विनायकरावांसारख्या कुशल नटाच्या आणि दिग्दर्शकाच्या सान्निध्यात राहिलो असल्यामुळं असेल, ते माझ्या अंगवळणी पडल होतं. एखादं वाक्य पूर्ण झालं, की मी ते स्वतःशीच पुटपुटून पाहतो.
‘जय मल्हार’च्या लेखनावेळचीच गोष्ट सांगतो. माझी मोठी मुलगी आशा (त्यावेळी लहान होती.) स्वयंपाकघरात धावत गेली आणि सुमनला म्हणाली,
‘आई, आई ! बघ , चल. काका भांडतायत.’
‘कुणाशी, ग ?’
‘कुणास ठावूक ? म्हणतायत, माझ्या घरातनं चालती हो !’
सुमननं धावत येवून पाहिलं; व माझं संवादलेखन चालू होतं. ते पाहून ती हसायलाच लागली आणि आशाला म्हणाली,
‘अग, हे भांडत नाहीत. लिहीतायत.’
संवाद लिहिताना कुठे बेताल होत नाही ना, याची माझी मीच खात्री करून घेत असतो. माझ्या संवादांना, समीक्षकांनी आणखी एक मार्मिक विशेषण लावलं आहे. त्यांच्या मते माझे संवाद ‘खटकेदार’ असतात. आता खटकेदार म्हणजे काय? हे जरी मला विशद करून सांगता आलं नाही, तरी त्याचं एक रहस्य सांगू शकेन. माझी पात्रं बोलताना नेहमी एकमेकांवर कुरघोडी केल्याप्रमाणं बोलत असतात. आपण जे बोलतो, त्यावर प्रत्युत्तर येवूच नये, या अभिनिवेशानं. साहजिकच समोरचे पात्र जेव्हा त्यावरही कुरघोडी करतं, तेव्हा प्रेक्षकांना त्यांची जुगलबंदी श्रवणीय वाटू लागते. टेनिसच्या खेळात समोरासमोरचे खेळाडू एकमेकांना चकवण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणं. म्हणजे जुगलबंदी ही गाण्यातच असते, असं नाही संवाद-लेखकालाही ती रंगवावी लागते
ही माझ्या संवाद-लेखनाची ठळक अशी वैशिष्टयं झाली. ती शिकवतो, म्हणून कोणाला शिकवता येत नाहीत तर ती रक्तातच असावी लागतात. ‘भाषाशैली ही शिकवता येणार नाही, शिकता मात्र येईल,’ असं ना. सी. फडक्यांनी ‘प्रतिभसाधना’त नाही म्हटलं ? माझ्याबाबतीत तर ते फार फार खर आहे. मला तरी संवाद लेखनातील हे चातुर्य कोणी शिकवलं होतं ? म्हणूनच असेल, अजूनपर्यंत मी ती वैशिष्टयं सांभाळीत आलो आहे. माझी ही सर्व आयुधं घेवूनच मी संवाद लिहायला बसलो; म्हणूनच असेल, बाबूरावांना ते एकदम आवडत गेले.
अर्धे अधिक संवाद लिहून झाल्यावर ते मला म्हणालेही,
‘पाटील, आपलं पिक्चर ‘बेष्ट’ होणार हं !’
बाबूराव खुशीत आले, की ‘बेष्ट’ हा शब्द नेहमी वापरायचे. एक गोष्ट खरी. कथावस्तू नाट्यपूर्ण असली, की संवाद लिहावे लागत नाहीत. ते आपोआप सुचत जातात. ती तशी नसेल, तर मात्र पंचाईत पडते, असा माझा तरी अनुभव आहे. संवाद लिहिताना डोकं खाजवावं लागलं, की समजावं, कथावस्तूत काही तरी कमी आहे. माझ्यावर ती पाळी आली नाही. म्हणूनच मी बरोबर पंधरा दिवसांत संवाद-लेखन पूर्ण करू शकलो.
तरी प्रश्न पडलाच, चित्राला नाव काय द्यायचं ? ‘वाघ्या-मुरळी’ हे नाव लघुकथेला ठीक होतं. चित्राचं नाव त्यापेक्षा चमकदार हवं होतं. नावात काय आहे, असे आपण म्हणतो. पण मी म्हणतो, नावात बरंच काही आहे. गुलाबाला आपण उद्या धोत्रा म्हटलं, तर ? एखाद्या सुंदर मुलीचं नाव धोंडी असलं, तर त्या नावानं तुम्ही तिला हाक माराल का? नावातही सौंदर्य असावं लागतं, औचित्य असावं लागतं. कोणत्याही नावाचं असंच आहे, मग ते नाव व्यक्तीचं असां, की चित्रपटाचं असां. यशस्वी चित्राचीच नावं पाहा ना! ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’ , ‘गड आला, पण सिंह गेला’, ‘माझं बाळं’. किती सूचक नावं आहेत ही ! तसं सूचक नाव मी शोधत होतो; पण सापडत नव्हतं, तेव्हा बाबूराव म्हणायचे,
‘मिळेल, मिळेल. तुम्ही लिहीत तर चला,’
आणि तसंच झालं. चित्राच्या ‘क्लायमॅक्स’च्या वेळी कल्लू बेरड जेव्हा पाटलाच्या वाड्यावर हल्ला करायला येतो; तेव्हा वाड्याच्या दारात थांबून तो गावक-यांना म्हणतो,
‘ऐका, रं, माझ्या गावक-यांनो, आज मी पाटलाचा मुडदा पाडणार हाय. ज्याला आडवं याचं असंल, त्यानं आपल्या बायकूचं कुकू पुसूनच यावं !’
हे ऐकून गल्लीतले लोक भिवून पळतात आणि आपापल्या दारांना आतून कड्या लावून लपतात. तेव्हा कल्लू आपल्या साथीदारांना ललकारतो,
‘बघता काय? या माझ्यामागनं. बोला, जर मल्हार !’
मी हे वाचताच बाबूराव म्हणाले,
‘दिनकरराव, थांबा, थांबा.’
मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तेव्हा ते हसले,
(सौजन्य – प्रेस्टीज प्रकाशन)
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया